गावात अधिका-यांच्या मुक्कामाने विकासाला चालना



Ø नववर्षात रोहदा येथे मुक्काम करून जिल्हाधिका-यांनी घालून दिला आदर्श
Ø आतापर्यंत जवळपास वीस अधिका-यांनी मुक्कामी राहून साधला संवाद
यवतमाळ, दि. 21 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील जवळपास एक हजार गावांचा कायापालट करण्याचे नियोजन आहे. यवतमाळ जिल्ह्यात 36 गावांमध्ये हे अभियान सुरू असून ग्राम विकासासाठी आता अधिकारी गावागावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधत आहे. एकप्रकारे या अभिनव उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे.
नववर्षाच्या सुरवातीलाच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा येथे मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला होता. जिल्हाधिका-यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे अनुकरण इतरही अधिकारी करीत आहे. आतापर्यंत जवळपास वीस अधिका-यांनी वेगवेगळ्या गावात मुक्काम केला आहे. यातून आरोग्य, शिक्षण, कृषी असे अनेक विषय निकाली निघत असून गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात यश येत आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी रोहदा येथे मुक्काम केल्यानंतर लोणी गावात गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी मुक्काम केला. त्यानंतर कळंब तालुक्यात गणेशवाडी गावात उपविभागीय अधिकारी संदीप अपार, नांझा गावात गटविकास अधिकारी सुशिल संसारे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, बेल्लोरी गावात तहसीलदार सुनिल पाटील, नेर तालुक्यात चिकणी डोमगा येथे तहसीलदार अमोल पवार, पाथरड गोळे येथे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे हे वेगवेगळ्या गावात मुक्कामी होते.  
उमरखेड तालुक्यातील चिंचोली गावात तहसीलदार भगवान कांबळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर नाल्हे, करंजी गावात  गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच येथे शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, चौधरा गावात जिल्हा परिषदेचे खेरडे व ढोले, घोडखिंडी गावात गटविकास अधिकारी अमित राठोड, पुसद तालुक्यातील शेलू (खु.) येथे तहसीलदार गरकल व इतर अधिका-यांनी मुक्काम केला.
या माध्यमातून प्रशासनाचे अधिकारी गाव स्तरावरील समस्या गावातच सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्राम सामाजिक परिवर्तनाचा हा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून गावागावात त्याचा चांगला प्रभाव दिसत आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती