एल निनोची चाहूल - पाणी अडवण्याची जबाबदारी
'एल निनो' ही फक्त हवामानाची घटना नाही, ती मानवी समाजाची सत्वपरीक्षा आहे. शास्त्रज्ञांनी यंदा 'सुपर एल निनो'चा इशारा दिला आहे. त्यामुळे मान्सून लांबणे, पावसाचे अनिश्चित चक्र, दुष्काळाची टांगती तलवार हे चित्र समोर येत आहे. पण भीतीने हातपाय गाळून चालणार नाही. एल निनोचा इतिहास सांगतो की, ज्या समाजाने आधीच तयारी केली, पाणी अडवले, जमीन वाचवली, तोच समाज संकटातून ताठ मानेने उभा राहिला. म्हणूनच मृद व जलसंधारण मंत्री या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक गावाला आवाहन आहे की, आता पाणी अडवण्याची तयारी करावी. निसर्गाचा इशारा 'एल निनो' हा पृथ्वीच्या नैसर्गिक हवामानचक्राचा भाग आहे. पण गेल्या १०० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. वृक्षतोड, जमिनीचा ऱ्हास, भूजलाचा बेसुमार उपसा आदी कारणांमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. परिणामी एकीकडे महापूर, दुसरीकडे तीव्र दुष्काळ. हा इतिहास आपल्याला शिकवतो की, एल निनोच्या काळात जलसंधारण नसेल तर मानवाला मोठी किंमत मोजावी लागते. माझ्या मते चिंता करण्याऐवजी आपण कृती करूया. मृद व जलसंधारण विभागाने 'गाळमुक्त ध...