उन्हाळ्याची चाहुल ; आरोग्याची अशी घ्या काळजी Ø डॉ. उमेश जोगे यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : उन्हाळ्याला सुरुवात झाल्यामुळे कडक उन्हात विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे, डोकेदुखी, अतिसार, पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात डीहायड्रेशन होणे तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश एस. जोगे यांनी केले आहे. उन्हाळ्यात चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ, ऊन लागणे, डीहायड्रेशन तसेच उष्माघात यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे केवळ पंखे किंवा एसीवर अवलंबून न राहता आहार आणि दिनचर्या योग्य ठेवणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड आणि चायनीज पदार्थांचे सेवन टाळावे. त्याऐवजी आहारात हिरव्या भाज्या, कोथिंबीर, फळे यांचा समावेश करावा. तसेच घरगुती गोड शरबत, लिंबूपाणी, काकडीचा रस, ताक व मठ्ठा यांसारख्य...