रॅगिंग, वाहतूक नियम व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत कायदेविषयक शिबीर

 

            यवतमाळ, दि.17 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व दाते महाविद्यालय, यवतमाळ आणि जिल्हा वाहतुक शाखा, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि १२ ऑगस्ट रोजी "रॅगिंग, वाहतुकीचे नियम व अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

            या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन दाते कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू हे तर प्रमुख उपस्थीती म्हणुन उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे हे उपस्थीत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी आणि जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले.

            कार्यक्रमाचे वक्ते मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी यांनी रॅगिंचे प्रकार अगदी सोप्या भाषेत चित्रपटांमधील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना समजाविले. रॅगिंग म्हणजे मोठ्या विद्यार्थ्यांनी नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे किंवा हिणकस वर्तन करणे होय. आपल्या समाजात रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थी मानसिक त्रासात जातात, आणि कधी कधी गंभीर घटना घडतात, हे थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कडक कायदे लागू केले आहेत. या कायद्याच्या कलम ४ नुसार, जो कोणी रॅगिंग करतो किंवा त्यास मदत करतो, त्याला दोन वर्षापर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो असे यावेळी सांगितले.

            राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) २००९ नंतर रॅगिंगविरोधी नियम अधिक कडक केले आहेत. दोषी विद्यार्थ्यांवर निलंबन, शिष्यवृत्ती रद्द, परीक्षा थांबवणे, वसतिगृहातुन काढून टाकणे अशा शिक्षाही दिल्या जाऊ शकतात. काही राज्यांत ४-५ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षाही ठरवलेली आहे. तसेच रॅगिंग करणारे विद्यार्थी यामध्ये आढळल्यास ५ वर्षापर्यंत कुठल्याही संस्थेत प्रवेश मिळत नाही, महाविद्यालयातुन सुध्दा काढल्या जाते. सर्व महाविद्यालयामध्ये अॅटी रॅगिंग कमिटी स्थापन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

            प्रमुख वक्ते पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देत वाहन चालवितांना जे रस्त्यांनी चिन्ह दाखविले जातात त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. तसेच अपघात हा जाणूनबुजुन होत नाही तर आपल्या चुकीमुळे होतात याबाबत माहिती दिली. हेल्मेट वापरने सुध्दा आज काळाची गरज आहे. चालानपासुन वाचण्यासाठी हेल्मेट न वापरता स्वतःचा जिव वाचविण्यासाठी हेल्मेट चा वापर करावा. हेल्मेट असेल व अपघात झाल्यास डोक्याला मार लागणार नाही याबाबत माहिती दिली. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी गाडो चालविणे गुन्हा असल्याचे सुध्दा यावेळी सांगितले. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने हे नियम समजून घेतले आणि काटेकोरपणे त्यांचे पालन केले पाहिजे. तसेच अमंलीपदार्थ सेवनामुळे विद्यार्थ्यांचे कसे हाल होतात व घरातील आई वडीलांची सुध्दा अतोनात नुकसान कसे होते याबाबत माहिती दिली.

            शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रा. डॉ. राजेश सिंगरू यांनी दैनंदीन जिवनात कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असुन त्याचे पालन करण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांना कायदेपालन, शिस्त आणि नशामुक्त जीवनशैली स्विकारून जबाबदार नागरिकत्व दाखवावे असे आवाहन केले.

            जनजागृती शिबीराचे सुत्रसंचालन प्राध्यापक स्नेहल सोनटक्के यांनी तर आभारप्रदर्शन प्राध्यापक नलिनी जाधव यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी या कायदेविषयक शिबीरास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान