शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचा तुटवडा; नागरिकांनी स्वैच्छिक रक्तदानासाठी पुढे यावे
उन्हाळी सुट्ट्यांमुळे शाळा व महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत शासकीय रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी रक्तदात्यांना दररोज रक्तकेंद्रात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान ही एक मौल्यवान जीवनरक्षक देणगी आहे. आणि सदर देणगी ही सुरक्षित आणि शाश्वत रक्तपुरवठा आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज तयार करण्यासाठी मुख्य स्रोत आहे. सिकलसेल अनिमिया आणि थैलेसेमिया यांसारख्या परिस्थितीसाठी आणि नियमित रक्तपुरवठा आवश्यक असलेल्या अनेक रुग्णांसह सर्व गरजू रुग्णांसाठी ऐच्छिक-सुरक्षित रक्तपुरवठा करणे आवश्यक आहे. हिमोफिलिया आणि रोगप्रतिकारक कमतरता यांसारख्या दीर्घकालीन परिस्थिती असलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान मोहीम देखील महत्त्वाची भूमिका बजावते.
रक्तसंक्रमणावर अवलंबून असलेल्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी सुरक्षित रक्तसाठा निर्माण करणे आवश्यक असून निरोगी नागरिकांनी नियमित व सुरक्षित रक्तदान करावे, समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात ऐच्छिक रक्तदान करून रक्तदानाविषयी जनजागृती करावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. विकास येडशिकर तसेच रक्तपेढी प्रमुख डॉ. विरेंद्र खडसे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment