खरीप हंगामात जिल्ह्यात ७१ टक्के खतांचा बफर साठा पूर्ण
जिल्हाधिकारी विकास मीना
खरीप हंगाम २०२६ साठी यवतमाळ जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगाने सुरू असून १८ मे २०२६ पर्यंत एकूण ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा एकूण ७ हजार ८५० मेट्रिक टन बफर साठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार ५८६ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून २ हजार २६४ मेट्रिक टन साठा अद्याप बाकी आहे.
युरिया खतासाठी ६ हजार ५५० मेट्रिक टन उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार ५४१ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून ६९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. डीएपी खतासाठी १ हजार ३०० मेट्रिक टन उद्दिष्टापैकी १ हजार ४४ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
संस्थावार पाहता, एमएआयडीसीने एकूण बफर साठा उद्दिष्टाच्या मेट्रिक टन उद्दिष्टापैकी ७९ टक्के पूर्तता केली आहे. या संस्थेकडे युरियाचा आणि डीएपीचा एकूण १ हजार ८४९ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी ४९१ मेट्रिक टन बफर साठा बाकी आहे.
व्हीसीएमएफने युरिया आणि डिएपीचा एकूण ५ हजार ४०० मेट्रिक टन उद्दिष्टापैकी ३ हजार ६७७ मेट्रिक टन साठा उपलब्ध करून ६८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच एमसीडीसीने ११० मेट्रिक टन उद्दिष्टापैकी ६० मेट्रिक टन साठा उपलब्ध करून ५५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये यासाठी बफर साठा उभारणीवर विशेष भर दिला असल्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी सांगितले आहे.
रासायनिक खतांची तालुकानिहाय, वितरकनिहाय उपलब्धता पाहण्यासाठी जिल्हा स्तरावर https://agricultureyavatmal.blogspot.com/2025/06/box-sizing-border-box-margin-0- padding.html ब्लॉगस्पॉट तयार करण्यात आला असून, संनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणेत आली आहे. शेतकऱ्यांनी याचा वापर करून, खत खरेदी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment