दहावीत शासकीय निवासी शाळांचा शंभर टक्के निकाल
विद्यार्थीनींचे घवघवीत यश
मोहिनी पाईकराव अमरावती विभागात प्रथम
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सातही निवासी शाळांचा निकाल जवळपास शंभर टक्के लागला असून शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, महागाव येथील तब्बल ११ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये आरुषी अनिल जाधव व उपेक्षा गौतम खंदारे यांनी प्रत्येकी ९३.४० टक्के गुण मिळविले. तन्वी देवेंद्र भगत हिने ९२.४० टक्के, दर्शना दिलीप नरवाडे हिने ९१.४० टक्के, कांचन रामचंद्र वानखेडे हिने ९१.४० टक्के, संजीवनी गजानन वानखेडे हिने ९१.२० टक्के, अप्रजिता माधव सोंगाडे ९१ टक्के, श्रुतिका विनोद इंगोले, प्राजली गजानन जाधव व समता दलित कांबळे यांनी प्रत्येकी ९०.६० टक्के तर नियती चिंतामण खोकले हिने ९० टक्के गुण मिळविले आहेत.
अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, मरसुळ ता. उमरखेड येथील कु. मोहिनी अनिल पाईकराव हिने ९३.६० टक्के गुण मिळवून समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधून अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यशस्वी विद्यार्थिनी, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका मंगला बालाजी भोयर व सुनंदा श्रीराम बोरीकर, शिक्षकवृंद तसेच पालकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. शाळास्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त, मंगला मून यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यांनी केले.
Comments
Post a Comment