आदिवासी कल्याण योजनांच्या जनजागृतीसाठी जनभागीदारी अभियान
१८ ते २५ मेदरम्यान माहिती, शिक्षण व संवाद शिबिरांचे आयोजन
५०९ गावांमध्ये होणार जनजागृती
केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासी कल्याण योजनांच्या जनजागृतीसाठी पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत १८ ते २५ मे या कालावधीत जनभागीदारी अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ५०९ गावांमध्ये माहिती, शिक्षण व संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी दिली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून २१९ धरती आबा आणि २९० जनमन अभियानातील गावांमधील आदिवासी समाजापर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवणे, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती, लाभार्थी संपृक्तता शिबिरांचे आयोजन, तक्रार निवारण आणि हक्कांबाबत जागरुकता, आदिवासी सेवा केंद्रात तक्रारींची नोंद घेवून जनसुनावणीद्वारे निवारण करणे, आरोग्य तपासणी, सिकलसेल आजार, पोषणाबाबत जनजागृती करणे, आदिवासी युवक महिला उद्योजकांच्या यशोगाथा निर्माण करणे, आदिकर्मयोगी पोर्टलचा प्रचार प्रसार करणे इ. उपक्रम राबविले जात आहेत.
जिल्ह्यात ही मोहीम प्राधान्याने राबवून सर्व आदिवासी तसेच विशेष दुर्बल आदिम जमातीच्या कुटुंबांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले आहे.
४७८ गावांमध्ये आदिसेवा केंद्र स्थापन
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, झरी जामणी, घाटंजी, राळेगाव, कळंब, यवतमाळ, मारेगाव, बाभुळगाव आणि वणी या नऊ तालुक्यांतील ५०९ गावांचा या अभियानात समावेश आहे. यापैकी ४७८ गावांमध्ये “आदिसेवा केंद्र” स्थापन करण्यात आले असून, ग्रामपंचायत कार्यालयांमधून ही केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, बँक खाते उघडणे आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
सव्वालाख लाभार्थ्यांपर्यंत विविध सुविधा
जिल्ह्यात आतापर्यंत ११५ जनजागृती शिबिरांच्या माध्यमातून ९ तालुक्यांतील ५०९ गावांमधील सुमारे १ लाख ३२ हजार २२३ लाभार्थ्यांपर्यंत विविध सुविधा जसे आधार कार्ड, बॅंक खाते इत्यादी पोहोचविण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment