विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज रहा
- जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा
विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश झिमटे, उपजिल्हाधिकारी अजित येळे, कार्यकारी अभियंता व्ही.ए.शिरभाते, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, तहसिलदार राहूल मोरे इ. विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, शासनाच्या संकेतस्थळ, समाजमाध्यमांवरुन राजकीय नेत्यांचे छायाचित्र, शहरी व ग्रामीण भागातील होर्डींग, बॅनर, पोस्टर, भित्तीपत्रके हटवावे, विकासकाम व इतर कामांच्या निविदा काढण्यात येवू नये, आचारसंहिता कक्षांची स्थापना करावी, आचारसंहिता कालावधीत काय करावे, काय करु नये याबाबत जनजागृती करावी, भरारी पथके नेमावे, निवडणुकीसाठी मर्यादित प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, वृत्तपत्रातील जाहिराती, पेडन्यूजवर लक्ष्य ठेवून कारवाई करावी, जिल्हास्तरिय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती नेमावी, मतदारांची संख्या कमी असली तरी बोगस मतदान होणार नाही यांची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी उमेदवार किंवा संबंधित व्यक्तींकडून हॉटेल, रिसॅार्ट इ. ठिकाणी कैद किंवा बंदिस्त करण्याच्या घटनांवर लक्ष्य केंद्रीत करुन कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.



Comments
Post a Comment