श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा
> पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे निर्देश
> मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन
> सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज
यवतमाळ, दि. ७ : भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र धामणगाव (देव) येथे दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रा महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक घेवून भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पराग पिंगळे, तिर्थक्षेत्र संस्थानचे पदाधिकारी गजानन अंबोरे, राजू देशमुख, सरपंच जगदिश जाधव उपस्थित होते.
पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेत या यात्रा महोत्सवाला राज्यभरातून भाविक व पालख्या येत असतात. त्यांच्या सोयीसुविधेसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, शौचालय, पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर, अखंडित वीज पुरवठा, विद्युत रोषणाई, एसटीच्या अतिरिक्त बस गाड्या, आरोग्य पथक, अग्निशमन, सीसीटिव्ही यंत्रणा, मदत कक्ष, सावलीसाठी निवारा, हायमास्ट लाईट, वाहन पार्किंग व्यवस्था, बॅरिकेटींग, बस थांबा आदी सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच श्री क्षेत्र धामणगाव देव परिसरात स्वच्छता, गर्दीचे व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, घंटागाड्या, कचराकुंड्या, भक्त निवासाची स्वच्छता व डागडुजी, रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने विविध विभागांनी नियोजनबद्ध कामे पूर्ण करावीत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र धामणगाव देव येथे भेट देवून पाहणी करण्याचे निर्देश दिले.
५० हजार भाविक येण्याचा अंदाज
श्री क्षेत्र धामणगाव देव येथे भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित दोन दिवसीय यात्रा महोत्सवात बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावतीसह विविध भागातून सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज या बैठकीत वर्तविण्यात आला. त्याअनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. संजय राठोड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी यावेळी दिल्या.
००००

Comments
Post a Comment