शेतकऱ्यांनी 'अॅग्रीस्टॅक' अंतर्गत 'शेतकरी ओळखपत्र' काढावे
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन
आतापर्यंत 4 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण
यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : शासनाच्या ‘अॅग्रीस्टॅक या महत्त्वपूर्ण डिजिटल प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ‘शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ’१२ अंकी शेतकरी ओळख क्रमांक दिला जात असून, भविष्यातील सर्व कृषी योजनांसाठी हा आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
अॅग्रीस्टॅक म्हणजे काय?
‘अॅग्रीस्टॅक’ हा केंद्र शासनाचा एक डिजिटल उपक्रम असून, शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती (जमीन, पिके, लाभधारक माहिती इ.) एकत्रित करून एक एकात्मिक डेटाबेस तयार केला जात आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
या ‘शेतकरी ओळखपत्र मुळे शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना, पीक विमा, कृषी कर्ज तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल. थेट लाभ हस्तांतरण डी बी टी प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक होणार आहे. यावर्षीपासून अनुदानित रासायनिक खतांचे वितरणही ओळख क्रमांक च्या आधारे करण्यात येणार असल्यामुळे हा आयडी असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
जिल्ह्यातील एकूण ४ लाख ६६ हजार ८३२ शेतकऱ्यांपैकी ४ लाख ३९ हजार ४०० शेतकऱ्यांनी ‘शेतकरी ओळखपत्र’ नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अद्याप २७ हजार ४३३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.
तरी उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक व ७/१२ उतारा इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या जवळच्या सी एस सी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन तातडीने नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे
Comments
Post a Comment