मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत विदर्भातील पहिले ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित शेतकरी व वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय
यवतमाळ, दि. २४ मार्च २०२६ :राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिले ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता जनार्धन चव्हाण, शशांक पोंक्षे , उपकार्यकारी अभियंता सुहास मेश्राम,प्रविण गवळी यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत असून, महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्राभोवती विकेंद्रीत स्वरूपात सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती केली जात आहे. तसेच काही भागात नवीन ३३ केव्ही उपकेंद्रांची उभारणीही करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक अभियंते प्रविण दरोली, दिपक देवहाते व दीपाली माडेलवार यांच्या पुढाकाराने परिमंडळात या योजनेला गती देण्यात आली आहे. परिमंडळातील सुमारे २ लाख ८० हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेद्वारे दिवसा वीज मिळू लागली आहे.
जाम बाजार येथील हे उपकेंद्र १० एमव्हीए क्षमतेचे असून, या उपकेंद्रातून ११ केव्हीचे एकूण ६ फीडर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यात जाम बाजार, पारवा आणि वानवारला या भागांसाठी प्रत्येकी कृषी व गावठाण असे ३ कृषी व ३ गावठाण फीडरचा समावेश आहे.
या उपकेंद्रामुळे परिसरातील एकूण सुमारे ५ हजार वीज ग्राहकांना खात्रीशीर व दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात २,४५० शेतकरी, २,२०० घरगुती, २७८ व्यावसायिक आणि ५३ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊन शेती कामे सुलभ होणार असून, ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.

Comments
Post a Comment