विशेष वृत्त : शबरी महामंडळाच्या सहकार्याने जिजामाता वनधन केंद्राची भरारी; आदिवासी महिलांना मिळाला स्वावलंबनाचा मार्ग
जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात उभारण्यात आलेले जिजामाता वन धन विकास केंद्र आज आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे यशस्वी मॉडेल ठरत आहे. प्रधानमंत्री जनमन उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राने अनेक कुटुंबांचे जीवनमान उंचावले असून, स्थलांतरित मजुरांपासून आत्मनिर्भर उद्योजकांपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास घडवून आणला आहे.
एकेकाळी रोजगाराच्या अभावामुळे आणि आर्थिक संकटामुळे अनेक आदिवासी कुटुंबांना हंगामी स्थलांतर करावे लागत होते. महिलांची भूमिका स्वयंसहाय्यता गटांमधील बचत आणि कर्ज व्यवहारांपुरती मर्यादित होती. मात्र स्थानिक पातळीवर झालेल्या प्रयत्नांमुळे परिस्थितीत मोठा बदल घडून आला.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि दिशा फेडरेशन यांनी गावागावात जनजागृती मोहीम राबवून स्थलांतराचे दुष्परिणाम समजावून सांगितले. स्थानिक संसाधनांवर आधारित शाश्वत उपजीविकेचा मार्ग शोधण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यात आले. याच प्रक्रियेतून २०२४ मध्ये जिजामाता वन धन विकास केंद्राची स्थापना झाली.
केंद्रामार्फत वनउत्पादनांचे संकलन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवण आणि विपणन यावर आधारित उपक्रम सुरू करण्यात आले. सुरुवातीला केवळ दोन स्वयंसहाय्यता गट या उपक्रमात सहभागी झाले होते. मात्र सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे महिलांचा सहभाग वाढत गेला.
राष्ट्रीय उद्योजकता व लघुउद्योग विकास संस्था यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना व्यवसाय व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि विपणन याबाबतचे ज्ञान मिळाले. शासनाच्या विविध योजनांसह स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे केंद्राची कार्यक्षमता अधिक बळकट झाली.
आज जिजामाता वन धन विकास केंद्रात ५५ महिला कार्यरत असून त्यामध्ये प्रामुख्याने कोलाम आदिवासी समाजातील महिलांचा समावेश आहे. या केंद्रामध्ये वनमधील शुद्ध मध, गोवर धूपबत्ती आणि गोंद यांसारख्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, हे केंद्र ट्रायफेड आणि शबरी नॅचरल्स या नामांकित ब्रँडशी जोडले गेले आहे. तसेच ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभागी होऊन उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. विविध प्रदर्शने आणि मेळ्यांमधील सहभागामुळे उत्पादनांची ओळख वाढली असून ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
भविष्यात केंद्रामध्ये आधुनिक मध प्रक्रिया यंत्रणा, धूपबत्ती उत्पादन युनिट, अत्याधुनिक पॅकेजिंग सुविधा आणि वजन काटा यंत्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ब्रँडिंग आणि विपणनावर विशेष भर देऊन राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या यशामागे केंद्राच्या अध्यक्षा शारदा करजारे यांचे नेतृत्व आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांनी स्थलांतराचा मार्ग सोडून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.
जिजामाता वन धन विकास केंद्र ही केवळ एक योजना नसून आदिवासी समाजासाठी आशा, सक्षमीकरण आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनली आहे. स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर, सामूहिक प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर ग्रामीण विकासाचा नवा आदर्श या केंद्राने निर्माण केला आहे




Comments
Post a Comment