काश्मिरमध्ये भारतावर प्रेम करणारा वर्ग मोठा - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

यवतमाळ, दि. 3 : जम्मू-काश्मिर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. आपल्या मातृभुमीच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्या देशभक्तीला सलामच केला पाहिजे. एवढेच नाही तर काश्मिरमध्ये भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
यवतमाळ येथील वायझेड या वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे उपस्थित होते.
गत काही महिन्यांपासून काश्मिरमध्ये दगडफेक कमी झाली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक जुन्या चित्रफिती दाखवून स्थानिकांना भडकविण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रसार माध्यमांतून बरेचदा काश्मिरबाबत जे दाखविले जाते ते पूर्ण सत्य असेलच असे नाही. कधीकधी अतिरंजीत दाखविण्याचा प्रयत्न होतो. काश्मिरच्या सकारात्मक बाबी कमी प्रक्षेपित होतात. आता काश्मिर बदलत आहे. केंद्र सरकार, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, स्थानिक सरकार, स्थानिक पोलिस यांच्या समन्वय चांगला आहे. काश्मिरमधील 4 हजार 500 मुस्लीम स्त्रिया भारत सरकारच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत, या बाबी जनतेसमोर आल्या पाहिजेत. गत काही वर्षात घुसखोरी कमी झाली आहे, हे सरकारचे यश आहे.
नक्षलवाद्यांनासुध्दा आपण चोख उत्तर देत आहोत. नक्षली कारवायांमध्ये 20 ते 25 टक्के घट झाली आहे. याठिकाणी सरकारची चांगली कामे असल्यामुळे जनतेचे सहकार्य मिळत आहे. राजकारणात, समाजकारणात टिकाटिपणी झाली पाहिजे. पण त्यात राष्ट्रहित महत्वाचे आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. उत्तर कोरिया, चीन यापेक्षा आपण वेगळे आहोत. प्रसार माध्यमांचे यात महत्वपूर्ण योगदान आहे.
यवतमाळच्या प्रसारमाध्यमांनी किटकनाशक फवारणी हा विषय राष्ट्रीय स्तरावर आणला. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. त्यामुळे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी लगेच उपाययोजना केल्यात. यात महत्वाचे म्हणजे एक्सपर्ट डॉक्टरांचे पथक त्वरीत यवतमाळ येथे पाचारण करण्यात आले. त्यामुळे विषबाधित शेतक-यांचा आकडा आपण वाढू दिला नाही. प्रसारमाध्यमांमुळे समाजाला न्याय मिळतो. वायझेड वृत्तवाहिनीचे संचालक राजाभाऊ ठाकरे हे लोकसभेतील सहकारी आहेत. जिल्ह्यात वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेटवर्क पसरविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी हाती घेतले आहे, त्यांच्या या कामाला निश्चितच शुभेच्छा आहेत, असे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृत्तवाहिनीचे संचालक राजाभाऊ ठाकरे यांनी तर संचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.                                                      
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी