खेळ हे जीवनाचे महत्वाचे अंग - पालकमंत्री येरावार
यवतमाळ , दि. 29 : देशाची ओळख ही स्वास्थावर ठरत असते. देश सुदृढ ठेवायचा असेल तर युवापिढीचे स्वास्थ चांगले असणे आवश्यक आहे. स्वास्थाचा संबंध हा खेळाशी येत असतो. खेळामुळे मन निरोगी राहते. निरोगी मन राज्याला आणि देशाला प्रगतीपथवार नेऊ शकते. त्यामुळे खेळ हे जीवनाचे महत्वाचे अंग आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दाते बीपीएड कॉलेज येथे क्रीडा भारती, हॉकी असोसिएशन, वुमेन्स स्पोर्ट क्लब, बाबाजी दाते क्रीडा अकॅडमी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप वडनेरकर होते. मंचावर अरविंद तायडे, हॉकी खेळाडू बबलू यादव, क्रीडा भारतीचे अध्यक्ष सतीश पाठक, महाविद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर, अनिल नायडू, राजेश गडीकर आदी उपस्थित होते. संगणक, व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या युगात मैदानी खेळ कमी होत आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, स्पर्धेत आपला पाल्य टिकावा यासाठी पालकांकडून नेहमी अभ्यासाचा तगादा सुरु असतो. आमच्या काळात खेळासाठी क्रीडांगणावर जाणे अनिवार्य होते.