सिमेवरील सैनिकांमुळेच देशातील नागरिकांचे रक्षण - अतिरिक्त जिल्हाधिकारी जाजू
v जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन यवतमाळ, दि. 29 : भारतीय संस्कृती ही मूळातच शांतताप्रिय आहे. याचा अनुभव जगानेसुध्दा घेतला आहे. मात्र कोणी आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या सिमेवर असलेल्या बहादुर सैनिकांमुळे नागरिकांचे रक्षण होत असून त्यामुळेच आपण शांततेची झोप घेऊ शकतो, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथील बळीराचा चेतना भवन येथे शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, फ्लाईट लेफ्टं. तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ, राजेंद्र डांगे, मनिष गंजीवाले आदी उपस्थित होते. आजचे सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी कावा होय, असे सांगून अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू म्हणाले, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले. कोणत्याही देशाने भारताला कमजोर समजू नये. शांतताप्रिय असलो तरी इतर देशाची कुरघोडी भारत कदापी सहन करीत नाही.