शेतपिकाला योग्य दर मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*मोतीराम लहाने कृषि समृद्धी प्रकल्प राबविणार
* शेतकरी उत्पादक कंपनीचे जाळे उभे करणार
यवतमाळ, दि. 20 : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची योग्य साथ मिळाल्यामुळे जिल्ह्यात चांगले पिक आले आहे. तसेच जलयुक्तमुळे पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी रब्बीची विक्रमी पेरणी केली आहे. गेल्या महिन्यापासून खरीपाचे पिक शेतकऱ्यांच्या हाती पडत आहे. शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात शेतमाल विकावा लागू नये, यासाठी जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीचे जाळे विणण्यासोबतच शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी, दि. 19 जानेवारी रोजी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा कृषि अधीक्षक दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शेतपिकाचे यावर्षी चांगले प्रमाण असले तरी सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांना जादा दर मिळालेला नाही. इतर जिल्ह्यात कापसाला सहा हजाराच्या वर भाव मिळत असताना जिल्ह्यात केवळ साडेपाच हजार रूपये दर आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन आणि तूरीची स्थिती आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात येताच व्यापारी भाव पाडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. नाफेडच्या माध्यमातून शेतमाल खरेदी करण्यात येत असली तरी व्यापाऱ्यांच्या खरेदी भावावर त्यांचा परिणाम दिसून येत नाही. यासाठी या एजंसीना खरेदीचे उद्दिष् देणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनास यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आणि खात्रीचे उत्पन्न मिळावे, यासाठी शेतमालावर प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांकडूनच उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 'केम'च्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करून शेतमालावर आधारीत उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्ह्यात मोतीराम लहाने कृषि समृद्धी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनीचे जिल्ह्यात किमान 50 समूह तयार करावेत. या माध्यमातून शेतमाल खरेदीची प्रक्रिया राबविता येणे शक्यत आहे. या समुहांना नाबार्डसारख्या वित्तीय संस्थांकडून कर्ज, साठवणुकीची सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि ब्रॅण्डींगसाठी सहकार्य करण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यात भाजीपाल, कापूस, सोयाबीन, तूर आदी नगदी पिक खरेदीसाठी समूह स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येतील. त्यांना आवश्यक असणारे सर्व परवाने एकाच दिवशी एकाच ठिकाणाहून मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
00000
राज्य निवडणूक आयोगाचे ‘कॉप अॅप’ विकसित
*नागरिकांना थेट करता येणार आचारसंहिता भंगच्या तक्रारी
यवतमाळ, दि. 20 : निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात. तसेच सामान्य नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी थेट निवडणूक विभागाकडे दाखल करता याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ‘कॉप’ (COP) सिटिझन ऑन पेट्रोल हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगच्या तक्रारी करता येणार असून तक्रार कर्त्यांचे नाव पूर्णतः गोपनिय राहणार आहे. त्यामुळे जिल्हयात होवू घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जर कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे नागरिकांना निदर्शनास आल्यास या कॉप अॅप वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
नागरिकांना आचारसंहितेचा भंग होताना दिसत असूनही केवळ भितीपोटी तक्रार करण्यास पुढे येत नसत. त्यामुळे तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवून आचारसंहितेची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कॉप हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपमध्ये अत्यंत सुलभरित्या स्वतःचे नाव गोपनिय ठेवून आचारसंहिता भंग होत असणा-या ठिकाणावरून नागरिक तक्रार नोंदवू शकणार आहे. नागरिकांची तक्रार येताच या अॅप मार्फत घटनेपासून २ किलोमिटर परिसरातील उपस्थित असणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना या तक्रारीचा तपशिल मोबाईलवर प्राप्त होणार आहे. त्यामुळे या आचारसंहिता भंगची कारवाई तातडीने अधिका-यांकडून करण्यात येणार आहे.
नागरिकांनी हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून यात नोंदण करून त्याव्दारे आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदवू शकणार आहे. या तक्रारीत होणा-या भंगाचे छायाचित्र, भंगाच्या स्थळाचे जीपीएस लोकेशन, भंगाचा प्रकार व तपशिल याची माहिती अॅपव्दारे निवडणूक विभागाला पाठविता येणार आहे. ज्या ठिकाणावरून ही तक्रार झाली त्या दोन किलोमिटर परिक्षेत्रात असलेल्या निवडणूक विभागाच्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना या तक्रारीची माहिती एसएमएस व ई-मेल वरून प्राप्त होणार आहे. यावरून या तातडीने दखल घेऊन यावर कारवाई होणार आहे. तसेच झालेल्या कारवाईची माहिती तक्रारदारास मिळणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कॉप अॅप डोउनलोड करून आचारसंहितेता भंग होत असलेल्या तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
00000
शेतकरी कुटुंबांना अपघात विमा योजनेचे कवच
* गोपीनाथ मुंडे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
*दोन लाखापर्यंत मदत मिळण्यास शेतकरी पात्र
यवतमाळ, दि. 20 : शेती व्यवसाय करताना किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शेतक-यांस होणारे अपघात, अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीला समोर जावे लागते. त्यामुळे अशा शेतक-यांच्या कुटुंबाना आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना’ सुरू केलेली आहे. अशा अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
शेतकरी कुटुंबांना शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का, जनावरांचा हल्ला, बुडून मृत्यू, प्राणीदंश अशा नैसर्गिक आपत्तीला समोर जावे लागते. तर रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात उंचावरून पडणे, दंगल, नक्षलवादी हल्ला अन्य कुठल्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढावतो. तसेच यामध्ये काही शेतक-यांना अपंगत्वही येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून कुटुंबांवर अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना’ शासनाने सुरू केलेली आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामा झाल्यास २ लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निमामी झाल्यास १ लाख रूपयांची मदत या विमा योजनेतून मिळणार आहे.
या योजनेत १० ते ७५ वयोगटातील शेतक-यांचा समावेश करण्यात आला असून दावा सादर करण्यासाठी दावा पत्र, वारस नोंद-उतारा ६ क, शेतक-यांच्या वयाचा पुरावा, पोलिस एफआयआर किंवा जवाब, बॅंक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, ६-ड (फेरफार/गाव नमुना), शव विच्छेदन अहवाल, पोलिस स्थळ पंचनामा, अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे स्टॅम पेपरवर प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र, पोलिस मरणोत्तर पंचनामा आदी कागपत्रासह आपला प्रस्ताव अपघातानंतर लवकरात लवकर संबंधीत जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
00000
शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे
*समाज कल्याण विभागाचे आवाहन
*सिडींग स्लिप जोडावी लागणार
यवतमाळ, दि. 20 : शासनातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणारे पालकांच्या पाल्यांसाठी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येते. ही शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावे लागणार आहे.
शाळेने विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, बँक खात्याच्या क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार संलग्न केल्याचा पुरावा म्हणून संलग्नता (सिडींग) पावती सोबत जोडावी, याबाबत खात्री करून विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार आहे. याची सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
00000
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्रावर जमावबंदी
यवतमाळ, दि. 20 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी, दि. 29 जानेवारी रोजी विक्रीकर निरिक्षक पुर्व परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात जिल्हाधिकारी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जारी केले आहे.
यानुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षेच्या दिवशी परीक्षा चालू असताना सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
यवतमाळ, दि. 20 : सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे अर्ज भरण्यासाठी mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरणे, युजर आयडी पासवर्ड प्राप्त करून घेण्यासाठी तसेच महाविद्यालयाने प्रवेशीत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जाचे नुतनीकरण करण्याची सुविधा वेबसाईटवर करण्यात आली आहे, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment