सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचा - पालकमंत्री मदन येरावार

Ø पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त सहकार परिषद


यवतमाळ, दि. 29 : सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्रोतगृह सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, सहकारी बँकेचे संचालक नितीन खर्चे, सहकार भारतीचे अध्यक्ष अमित भिसे, सुदर्शन भालेराव, राजू जाधव, उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.
देशाला सहकार क्षेत्राची ओळख महाराष्ट्राने करून दिली, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, बिना सहकार, नाही उध्दार ऐवजी आता बिना संस्कार…नाही सहकार असा विचार करण्याची गरज आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या विचारावर मार्गक्रमण केले तर समाजातील शेवटच्या उपेक्षित माणसापर्यंत लाभ पोहचण्यास मदत होईल. सर्वसामान्य शेतक-यांचा जवळचा संबंध सहकार क्षेत्रासोबत येत असतो. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या जवळपास 4 लक्ष 60 हजार ऐवढी आहे. कर्जमाफीसाठी या सर्व शेतक-यांची जनसुविधा केंद्र, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल, विविध सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याने ऑनलाईन नोंदणी करण्यात यश आले. कनेक्टिव्हीटीची समस्या असूनसुध्दा त्यावर मात करीत दीड महिन्यात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला आहे. या माध्यमातून सहकार चळवळीचा शेवटच्या माणसासाठी उपयोग व्हावा यासाठी सहकार परिषद अधिक भक्कम होणे काळाची गरज आहे. शेखर सरेगावकर यांनी सहकार क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. सहकाराबद्दल एक भावना निर्माण होण्यासाठी संपूर्ण विदर्भात सहकार परिषदेचे आयोजन होत आहे. विकासाचा रथ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार योजना, कृषी मार्गदर्शन योजना, अंत्योदय, घरकूल जागा खरेदी योजना, सौभाग्य बिजली योजना आदी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांच्या कल्याणसाठी सरकार संवेदनशील असून त्यासाठी सहकार भारतीसारख्या संस्थांची जोड आवश्यक आहे.
तूर खरेदीला प्रथमच सरकारने मुदतवाढ दिली आहे. उडीद, मूग, कापूस, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतरच शेतक-यांनी आपला माल खरेदीसाठी आणणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतक-यांना खरेदीसाठी आता तात्काळत बसावे लागणार नाही. शेतक-यांचे हित जोपासणे महत्वाचे असून सरकार त्यादृष्टीने वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला बँक, विविध पतसंस्था जनहिताचे काम करीत आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सहकारी संस्था, विविध पतसंस्था, महिला बँक आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

  1. Online नोंदनी साठी वेबसाईट काय आहे..?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी