ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानमुळे गावांच्या शाश्वत विकासाला दिशा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
v विश्रामगृहात
केले वृक्षारोपण
यवतमाळ दि.6 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन
अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील एक हजार गावांचा विकास करण्याचे काम हाती
घेण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक कार्यरत आहेत.
हे ग्राम परिवर्तक शासन, प्रशासन आणि जनता यातील दुवा म्हणून काम करीत आहे.
त्यांचे कार्य कौतुकास्पद असून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानमुळे गावांच्या
शाश्वत विकासाला दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केले.
विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कॅबिनेट मंत्री संजय कुंटे पाटील, पालकमंत्री
मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य
कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी
उपस्थित होते.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून
गावांमध्ये सुरू झालेली कामे विशेष उल्लेखनीय आहे, असे सांगून मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांचा विश्वास जिंकण्यास यामुळे मदत होईल. तसेच शाश्वत
विकासाचे कार्य यातून घडेल व अतिदुर्गम भागातील गावखेड्यांमधील लोकांच्या मुलभूत
समस्या सोडवून गावे विकसीत करण्याचा उद्देश साध्य होईल.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली.
सोबतच ग्राम परिवर्तक मयुरी महातळे, भुषण नाईकर, प्रल्हाद पवार व दिनेश खडसे यांनी
गावात झालेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. बैठकीला अभियान व्यवस्थापक
युवराज सासवडे, अभियान सहाय्यक विजयसिंग राजपूत, रसिका बरगे, जिल्हा समन्वयक
अर्चना हिवराळे, प्रशांत कारमोरे, रिलांयन्स फाऊंडेशनचे संदीप वायाळ, ॲक्सिस बँक
फाऊंडेशनचे प्रतिनिधी, टाटा ट्रस्टचे
प्रतिनिधी व मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक उपस्थित होते.
विश्रामगृह परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण : राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण केले. सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या स्वयंसिंचित वृक्ष सुरक्षा गार्ड (सेल्फ वॉटरिंग ट्रीगार्ड
सिस्टीम) या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी वृक्ष लागवड केली. यावेळी आदिवासी
विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता
चंद्रकांत मरपल्लीकर, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.
०००००००
Comments
Post a Comment