जिल्हाधिका-यांकडून शेतकरी आत्महत्येच्या नऊ प्रकरणांचा आढावा
यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यातील शेतकरी
आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी
जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. जिल्हास्तरीय समितीच्या
बैठकीत एकूण 9 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात पात्र प्रकरणातील कुटुंबियांना
शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका
आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी
सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू
नये. तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप
आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ
देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी आर्णि तालुक्यातील माळेगाव
येथील कैलास पवार यांच्या कुटुंबियांना नरेगा अंतर्गत विहिरीचा लाभ, आर्णि
तालुक्यातील कु-हा येथील अक्षय पुसनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, मारेगाव
तालुक्यातील टाकळी येथील विठ्ठल जुमनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, केळापूर
तालुक्यातील अर्ली येथील संतोष बोरकर यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार
योजनेचा लाभ, घाटंजी तालुक्यातील आंबेझरी येथील विजय कोटनाके यांच्या कुटुंबियांना
शेळीवाटप, झरीजामणी तालुक्यातील दाभाडी येथील शरद आत्राम यांच्या कुटुंबियांना
विहिर व शेळीपालन, नेर तालुक्यातील सोनवाढोणा येथील राजेश राठोड यांच्या
कुटुंबियांना विहिर व शेतीला कुंपण, नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथील राजेश
तुपटकर यांच्या कुटुंबियांना विहिर आणि दिग्रस येथील रामनगरातील शत्रृघ्न शेंगर
यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे प्रस्तावित केले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पशुसवंर्धन
विभागाचे उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर
आदी उपस्थित होते. बैठकीला संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी
उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment