गंदगीमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून आरोग्यदायी वातावरण निर्मिती - सीईओ डॉ. पांचाळ
Ø मडकोना व गळव्हा येथे स्वच्छता सुविधांची पाहाणी
यवतमाळ, दि.14 : कोविड संक्रमणाच्या काळात नागरिकांमध्ये
आरोग्याबाबत जनजागृती आणि गावागावांत स्वच्छता निर्माण व्हावी, याकरीता नागरिकांनी
गंदगीमुक्त भारत मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
गंदगीमुक्त भारत मोहिमेच्या
अनुषंगाने त्यांनी पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाच्या प्रमुखांची आढावा सभा
घेतली. तसेच त्यांनी यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येणा-या मडकोना ग्रामपंचायत व
पंचायत समिती बाभुळगाव येथील गळव्हा ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतींच्या
सार्वजनिक शौचालय स्वच्छता सुविधांची पाहाणी केली. याप्रसंगी पाणी पुरवठा व
स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार चौधर, कार्यकारी अभियंता श्री. कोल्हे उपस्थित होते.
भारत सरकारच्या पेयजल व
स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमातंर्गत देशभरात
ग्रामस्तरावर नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत बदल घडवून आणणे, आरोग्यदायी सवयींमध्ये
वाढ करणे, स्वच्छता मोहीम राबवून ग्रामीण भागात आरोग्यदायी वातावारण निर्मिती
करण्याच्या उद्देशाने गंदगीमुक्त भारत मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे.
याअंतर्गत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत 8 ते 15 ऑगस्ट 2020 या
कालावधीत जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी
विविध उपक्रम राबविले जात आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर
सिंगल युज प्लास्टीक संकलन मोहीम राबविणे, गावामध्ये सार्वजनिक ठिकाण व इमारतींची श्रमदानातून
स्वच्छता करणे, ओडीएफ प्लस या मोबाईल अप्लिकेशनची माहिती देऊन जनजागृती करणे, स्वच्छता
संदेश व भित्तीचित्रे रेखाटने, गावस्तरावर श्रमदान करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची
स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत. मोहीम
काळात सरपंच, जलसुरक्षक यांनी स्थानिक नागरिकांना गंदगीमुक्त भारत मोहिमेत सहभागी
करुन घेताना ‘दो गज की दूरी और मास्क जरुरी’ या तत्वाचे पालन करुन गावाच्या
स्वच्छतेची मोहिम राबवायची आहे.
०००००००
Comments
Post a Comment