हुतात्मा झालेल्या वन कर्मचा-यांना वनमंत्र्यांची श्रध्दांजली

 





Ø राष्ट्रीय वन हुतात्मा दिन

यवतमाळ, दि. 11 : वन आणि वन्यजीव संरक्षणाचे कर्तव्य बजावतांना बलिदान दिलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने सन 2013 पासून 11 सप्टेंबर हा दिन राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी येथील वनभवनाच्या प्रशासकीय इमारतीत हुतात्मा झालेल्या वन कर्मचा-यांना श्रद्वांजली वाहिली.           यावेळी मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, उपवनसंरक्षक केशव वाबळे, राजेंद्र गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी वनमंत्री राठोड म्हणाले की, वन्यजीवांची आणि नैसर्गिक संसाधनांची चोरटी शिकार, अवैध वृक्षतोड, वनवे आदी रोखण्यासाठी वनअधिकारी आणि कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. यामुळे देशात मागील पाच वर्षात सुमारे 162 वन अधिकारी - कर्मचारी शहीद झाले आहेत. मानव आणि वने यांच्यात निर्माण झालेल्या संबंधाच्या संदर्भात राज्यातील वन अधिकारीसुध्दा वन संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतात. वन हुतात्म्यांच्या कुटुंबियांना विशेष आर्थिक लाभ देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करणार असून वन विभागाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात हुतात्मा स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

            पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण याबाबतची संकुचित मानसिकता पर्यावरणाच्या ऱ्हासाला अधिक कारणीभूत ठरत आहे. जंगलतोड, बेसुमार खनिज संपत्तीची लुट यावर अंकुश लावला तरच पर्यावरणाचे रक्षण करणे शक्य आहे आणि ही या वन हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही वनमंत्री राठोड म्हणाले.

            यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती