‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत - पालकमंत्री संजय राठोड
जिल्हास्तरीय मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या
हस्ते शुभारंभ
यवतमाळ, दि. 15 : कोरोनाच्या
पार्श्वभूमिवर राज्य शासनातर्फे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात
येत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे नागरिकांना हात धुणे, मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे या
बाबी सातत्याने सांगितल्या जातात. निरोगी राहण्यासाठी या सर्व सूचना अतिशय
महत्वाच्या आहेत. कोरोनाविरूद्धची लढाई ही एकट्या-दुकट्याची नसून सर्वांनीच
एकत्रीतपणे लढणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’
ही मोहिम सुरू केली असून यात सर्वांचे सहकार्य
अपेक्षीत आहे, अशी अपेक्षा पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.
यवतमाळ शहरातील बाजोरिया नगरात
माझे कुटूंब- माझी जबाबदारी या मोहिमेच्या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ करतांना
ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा कांचन
चौधरी, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण
पांचाळ, अपर जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध
बक्षी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी सुनिल
बल्लाळ, तहसिलदार कुणाल झाल्टे, पराग पिंगळे, डॉ. विजय अग्रवाल, नगरसेवक अमोल
देशमुख, विभा कुळकर्णी, संगीता कासार आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की या मोहिमेत जिल्ह्यातील शहर,
गाव, पाडे, वस्त्या, तांडे, येथील प्रत्येक नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी,
को-मॉरबीड असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास भेटून आरोग्याबाबत जनजागृती
करण्यात येणार आहे. नागरिकांनीसुद्धा सर्दी, खोकला व
ताप या आजाराची माहिती सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या टिमला द्यावी. जनतेच्या
सेवेसाठी शासन कटीबद्ध असून आतापर्यंत या कोरोनाविरूद्धच्या लढ्यात शासनाच्या
नियोजनामुळे व योग्य समन्वयातून यवतमाळ जिल्ह्यात कोरानाविरुद्ध प्रशासनाने चांगली
कामगिरी केली आहे.
यावेळी
पालकमंत्र्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग
रोखण्यासाठी सर्वांना ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ संदर्भात प्रतिज्ञा दिली.
नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी कोरानाविरुद्धच्या
लढ्यात नगरपरिषदेचे व आरोग्य विभागचे कर्मचारी पुढाकाराने काम करत असल्याचे
सांगितले. तसेच पालकमंत्री यांनी कोरोना रुग्णांसाठी बेड वाढवून देणे व आरोग्य
तपासणीसाठी निधी वाढवून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले की, कोविड-19
विरुद्ध सर्व जगात लढा सुरू आहे. जिल्ह्यात हा रोग पसरू नये म्हणून ‘माझे कुटूंब-माझी
जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान व
तदद्वनंतर 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दोन टप्प्यात सर्व्हे करण्यात येणार आहे. यात
जिल्ह्यातील सर्व नगर व ग्रामीण क्षेत्रात दोन टप्प्यात 7 लाख 39 घरातील सुमारे 27
लाख 70 हजार लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यात सुमारे तीन
हजार आरोग्य कर्मचारी दररोज 50 घरी जाऊन घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सीजन स्तर व
पुर्वव्याधींची तपासणी करणार आहेत. यावेळी नागरिकांनी आयएलआय व सारी रुग्णांची
माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ
यांनी एक महिण्यात कोविडची श्रृखंला तोडण्याचे व मृत्यू दर कमी करण्याची शासनाची
या अभियानामागील संकल्पना असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य सिताराम राठोड यांनी केले
तर उपस्थितांचे आभार तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी मानले.
तद्नंतर पालकमंत्री संजय याठोड यांनी बाजोरिया नगरातील
रामदास पांडे व निलेश येलमुले यांच्या घरी आरोग्य तपासणी पथकासमवेत जाऊन त्यांच्या
सर्व्हेक्षणाची माहिती घेतली.
यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
000
Comments
Post a Comment