शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 


यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण 15 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात पात्र प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये. तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिका-यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांची आस्थेवाईपणे विचारपूस करून किती शेती आहे, शेतीमध्ये काय पेरले, उत्पादन किती होईल, कोणत्या बँकेचे कर्ज आहे, आदींबाबत माहिती जाणून घेतली.

बैठकीला संबंधित गावांचे तलाठी, पोलिस पाटील, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल