कॉपीमुक्त वातावरणात परिक्षेसाठी सहकार्य करा
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
* जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना आवाहन
* भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
* 28 पासून बारावी, 7 मार्चपासून दहावीची परिक्षा
यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात दिनांक 28 फेब्रुवारीपासून बारावी, तर दिनांक 7 मार्च पासून दहावीची परिक्षा सुरू होत आहे. यावर्षी शंभर टक्के कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा पार पाडण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
बचत भवन येथे परिक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक त्यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी दिपककुमार मीना, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
परिक्षेसाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तथा महत्वाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना भरारी पथक प्रमुख म्हणून नेमन्यात आले आहे. या पथकांनी केंद्रांवर भेटी देऊन चांगल्या वातावरणात परिक्षा पार पाडण्यासाठी काम करावे, असे ते म्हणाले. भरारी पथक दिवसभरात किमान तीन ते चार केंद्रांना भेटी देतील. किमान पाऊण ते एक तास पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रावर थांबून पाहणी करावी, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या दिवशी अधिक दक्ष राहून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
परिक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप होणार नाही. तसेच केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केंद्रात प्रवेश करताना कॉपीला पायबंद घालण्यासाठी संशयितांची तपासणी केली जाणार आहे. महिला, मुलींची तपासणी महिला पोलिस कर्मचारी घेतील.
बैठे पथकांची भूमिका महत्वाची
कॉपीला आळा घालण्यासाठी बैठे पथकांची भूमिका महत्त्वाची आहे. या पथकांनी अधिक दक्ष राहून काम केल्यास कॉपीवर पुर्णपणे आळा बसू शकतो. त्यामुळे या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या केंद्रांवर बैठे पथक असतानाही उपद्रव आढळून येतील, त्या पथकांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
00000
मंगळवारी यवतमाळ येथे रोजगार मेळावा
यवतमाळ, दि. 18 : दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत यवतमाळ येथे मंगळवारी, दि. 21 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
नगर परिषद यवतमाळ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे नगर भवन, आझाद मैदान जवळ, येथे सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे. यात दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत विविध विषयाचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या बेरोजगार युवक-युवतींना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा घेण्यात येत आहे. यात बेरोजगार युवक-युवतींचे प्रशिक्षण अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्यांना येत्या काळात प्रशिक्षण देण्यात येतील. या मेळाव्यात प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना संधी असणार आहे. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना गुणवत्तेच्या आधारावर रोजगार उपलब्ध होणार आहे.
यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दीतील बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, तसेच याबाबत अधिक माहितीसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान कक्ष, मातोश्री रमाबाई आंबेडकर आयुर्वेदिक दवाखाना, पाटीपुरा येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी एस. एस. धुपे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक प्रांजली बाविस्कर यांनी केले आहे.
00000
उमरखेड येथील आरटीओ कॅम्प रद्द
यवतमाळ, दि. 18 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उमरखेड येथे मंगळवारी, दि. 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारा तालुकास्तरावरील कॅम्प रद्द करण्यात आला आहे.
नागरीकांच्या सोयीसाठी परिवहन विभागाचे शिबीर तालुकास्तरावर घेण्यात येतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी असल्यामुळे शिबिरासाठी विश्रामगृह होणार नाही, त्यामुळे उमरखेड येथील कॅम्प शिबीर रद्द करण्यात आले आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000
व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक जाहिर
यवतमाळ, दि. 18 : शिकाऊ उमेदवारी योजनेंर्तगत सत्र ऑक्टोबर 2016ची अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा दि. 6 ते 12 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेस 31 मार्च 2017 पर्यंत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पुर्ण करणारे सर्व प्रशिक्षणार्थी पात्र असणार आहे. त्यामुळे सर्व पात्र आणि माजी अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी 22 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा फार्म, परीक्षा शुल्क आणि सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्ससह मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सादर करावे. परीक्षा फार्म विहित मुदतीन भरलेला नसल्यास प्रशिक्षणार्थ्यांना परिक्षेस बसता येणार नाही. तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी ऑक्टोबर 2016 परीक्षेचे फॉर्म यापूर्वीच सादर केले आहेत, त्या सर्वांची परीक्षा 6 ते 12 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थ्यांनी याची नोंद घेऊन परीक्षा फॉर्म सादर करावे, आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य आर. बी. सावळे यांनी केले आहे.
00000
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने
लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 18 : विदर्भाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांच्या निधनानेशेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्त्व हरपले आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. धोटे यांनी आमदार आणि खासदार म्हणून केलेले कार्य पथदर्शी आहे.त्यांनी नेहमीच वंचित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नती आणि विकासाचा विचार केला. त्यांच्याकडे विशेष संघटन कौशल्य होते. राज्याचा विकास प्रादेशिक असमतोल ठेवून साधला जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक प्रदेशाला विकासाच्या मुख्य धारेत आणले पाहिजे हे त्यांचे केवळ मत नव्हते तर ते त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक दायित्व मानले होते. शेतकऱ्यांच्या प्रगतीबरोबरच विशेषतः विदर्भाच्या विकासाबाबत ते कमालीचे आग्रही होते. त्यांच्या निधनाने मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे एक संघर्षयुग संपले आहे.
00000
Comments
Post a Comment