जनमत, मतदानोत्तर चाचणीस मतदानापर्यंत बंदी
यवतमाळ, दि. 14 : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या
सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदान होईपर्यंत जनमत आणि मतदानोत्तर चाचणीस बंदी
घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईपर्यंत कोणत्याही
प्रकारच्या चाचणीस बंदी घालण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर प्रचारबंदी,
जनमत चाचणी आणि मतदानोत्तर चाचणी घेण्याबाबत निष्कर्ष प्रसिद्ध केले आहे.
जिल्ह्यातील 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर
चाचणी प्रसार माध्यमांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या
निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या
निवडणुकांमध्ये जाहिर प्रचार करण्यासाठी तसेच जनमत आणि मतदानोत्तर चाचणी घेणे आणि
त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी
जाहिर प्रचार 14 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता, दुसऱ्या टप्प्यासाठी 19
फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता थांबवावा लागणार आहे. जनमत आणि मतदानोत्तर
चाचणी 14 ते 21 फेब्रुवारी रोजी मतदान
संपेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच वर्तमानपत्रे नियतकालिके, माहिती पत्रके,
फलक किंवा तत्सम प्रसिद्धी, खासगी किंवा सरकारी रेडीओ, टीव्ही, केबल, डीटीएच,
प्रादेशिक किंवा स्थानिक केबल टीव्ही, सॅटेलाईट, एसएमएस, इंटरनेट, फेसबुक आणि
तत्सम उपलब्ध सोशल मिडीयाद्वारे जनमत चाचणी किंवा मतदानोत्तर चाचणींचे कुठलेही
निष्कर्ष प्रसिद्ध करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
विवाह मंडळ, विवाहाची नोंदणी करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 14 : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार
प्रत्येक विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या
विवाह नोंदणीच्या याचिकेमध्ये विवाह मंडळांची नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यामुळे
जिल्ह्यातील नागरीकांनी विवाहाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम
1998 व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियन आणि विवाह नोंदणी विभाग 1999 नुसार राज्यातील
सर्व विवाह मंडळ चालवू इच्छिणारी व्यक्ती किंवा गट, वधू-वर सूचक यांनी नोंदणी करणे
आवश्यक आहे. ही नोंदणी आपल्या कार्यक्षेत्रातील निबंधक, विवाह मंडळ आणि विवाह
नोंदणी यांच्याकडे वैद्यानिक कल 5 (1) नुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे विवाह
नोंदणीही कलम 6 (1) नुसार बंधनकारक आहे. त्यामुळे विवाह झालेल्या वर-वधू यांनी तीन
साक्षीदारासह वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहत असतील, त्याठिकाणच्या निबंधकाकडे व्यक्तिश:
उपस्थित राहून विवाह नोंदणी करावी लागणार आहे.
विवाह नोंदणीसंबंधी असलेल्या अधिनियमांच्या प्रती
राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या igrmaharashtra.gov.in या
वेबसाईटवर उपलब्ध आहे. विवाह मंडळाच्या नोंदणीची नियमावली, अर्जाचे नमुने, शुल्क
आदींची माहिती या अधिनियमात देण्यात आली आहे. विवाह मंडळ आणि विवाहाची नोंदणी
विहित वेळेत केलेली नसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे
विवाह मंडळ चालविणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे विवाह मंडळाची नोंदणी आणि पक्षकारांनी
त्यांच्या विवाहाची नोंदणी संबंधित क्षेत्रातील निबंधकांकडे तातडीने करून घ्यावी. नागरीकांनी
विवाह मंडळ आणि विवाहाची नोंदणी करून घेण्यासाठी निबंधक यांच्या कार्यालयात
कागदपत्रांसह संपर्क साधून नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment