पेपरवरून पेपरलेसकडे निवडणुकांची वाटचाल - जिल्हाधिकारी सिंह






 


Ø जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन

Ø एका वर्षात जिल्ह्यात 19798 नवमतदार

यवतमाळ, दि. 25 : लोकशाहीमध्ये निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रशासकीय दृष्टीने निवडणुकांच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे प्रशासनाला 24 बाय 7 काम करावे लागते. पूर्वीच्या काळात बॅलेट पेपरवर मतदान होत होते. आता मात्र इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन आल्या आहेत. तसेच पारदर्शी आणि विश्वासार्ह निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक ॲप विकसीत केले आहे. एक प्रकारे पेपरवरून पेपरलेसकडे निवडणुकांची वाटचाल सुरू असल्याचे मत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त निवडणूक विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

गतवर्षी झालेल्या निवडणुकीत जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले काम केले, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, निवडणुकीच्या कामाला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असते. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून प्रशासनावर मोठी जबाबदारी असते. आज साजरा होत असलेला हा 11 वा राष्ट्रीय मतदार दिन असून जिल्ह्यात गत एक वर्षात 19798 नवमतदारांची भर पडली आहे. तर एकूण मतदारांच्या संख्येत 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या 32935 आहे.  निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी ‘पीडब्ल्यूडी व्होटर्स’ॲप विकसीत केले आहे. तसेच पारदर्शी निवडणुकांसाठी ‘व्हीव्हीपॅट’, ‘सी-व्हीजील’ ई-ईपीआयसी आदींचा उपयोग करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय चांगले काम केले आहे. असेच काम भविष्यातही करीत रहा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले. तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी मतदार जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रांगोळी स्पर्धेची पाहणी केली.

प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी सांगितले की, मतदार हा लोकशाहीचा आधार आहे. मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता निवडणूक विभागाने जपली आहे. ‘ आम्ही आहोत सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागृत मतदार’ हे यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रिदवाक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक संजय रणखांबे (तीन हजार रोख व प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक पराग हेडावू (तीन हजार रोख व प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक प्रियंका राठोड (तीन हजार रोख व प्रमाणपत्र) यांना देण्यात आला. तसेच प्रोत्साहनपर बक्षीस वैष्णवी इंगोले आणि विशेष गौरव म्हणून संजय सांबजवार यांना पुरस्कृत करण्यात आले. उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून सचिन वाघ, राजेंद्र कटकमवार, कैलास राऊत, ज्योती कांबळे, जुबेरखान माजिद खान आणि पर्यवेक्षक म्हणून गाईड चव्हाण यांचा मान्यवरांनी सत्कार केला.

नवमतदार म्हणून विकी डोंगरे, खुशबू म्हात्रे, दिपक जाधव, रुपा करपते, कोमल काकस, शेख आरीफ शेख कबीर यांना मतदार छायाचित्र ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरिुध्द बक्षी आणि तहसीलदार कुणाल झाल्टे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसंदर्भात नाटिका सादर केली.

कार्यक्रमाचे संचालन विद्या चिंचोरे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी मानले. यावेळी तहसीलदार भाग्यश्री देशमुख, नायब तहसीलदार राजेश चिंचोरे, एकनाथ बिजवे, सहाय्यक करमणूक अधिकारी रुपाली बेहरे यांच्यासह निवडणूक विभागाचे संजय गोर्लेवार, मिलिंद बोरकर, प्रवीण घोडे, मनोज राठोड, रत्नाकर राऊत आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी