पांढरकवडा, राळेगाव तालुक्यातील शेतक-यांना दिवसा दहा तास वीज
v पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने 16 कोटी तात्काळ
मंजूर
यवतमाळ, दि.
26 : पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता दिवसाचे भारनियमन बंद होणार
आहे. या तालुक्यातील शेतक-यांना दिवसा दहा तास वीज देण्यात येणार असून आता
रात्री-बेरात्री शेतक-यांना ओलित करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही. या
निर्णयाने परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री मदन येरावार आणि
शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या पाठपुराव्यामुळे यासाठी 16
कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले आहे.
पांढरकवडा व
राळेगाव तालुक्यात सद्यस्थितीत नरभक्षक टी-वन वाघिणीचा वावर आहे. यासंदर्भात काही
दुर्देवी घटनासुध्दा घडल्या आहे. त्यातच या परिसरात दिवसा भारनियमन होत असल्यामुळे
शेतक-यांना शेतीचे ओलित करण्यासाठी रात्री-बेरात्री शेतात जावे लागत होते. शेतात
काम करतांना शेतक-यांच्या मनात नरभक्षक वाघिणीची भीती राहत होती. ही भीती दूर करून
शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार आणि किशोर तिवारी
यांनी या परिसरात दिवसाचे भारनियमन बंद करण्यासाठी पाऊले उचलली. याबाबत
मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून 16 कोटी रुपये मंजूर करून
घेतले. आता या परिसरात ओलित करण्यासाठी शेतक-यांना दिवसा दहा तास वीज देण्यात
येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना घाबरण्याचे कारण नाही. या निर्णयामुळे खरीप
हंगामातील कापूस, तूर, सोयाबीन तसेच रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शक्य होणार
आहे.
००००००
Comments
Post a Comment