पांढरकवडा, राळेगाव तालुक्यातील शेतक-यांना दिवसा दहा तास वीज


v पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने 16 कोटी तात्काळ मंजूर
यवतमाळ, दि. 26 : पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता दिवसाचे भारनियमन बंद होणार आहे. या तालुक्यातील शेतक-यांना दिवसा दहा तास वीज देण्यात येणार असून आता रात्री-बेरात्री शेतक-यांना ओलित करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही. या निर्णयाने परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री मदन येरावार आणि शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या पाठपुराव्यामुळे यासाठी 16 कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले आहे.
पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात सद्यस्थितीत नरभक्षक टी-वन वाघिणीचा वावर आहे. यासंदर्भात काही दुर्देवी घटनासुध्दा घडल्या आहे. त्यातच या परिसरात दिवसा भारनियमन होत असल्यामुळे शेतक-यांना शेतीचे ओलित करण्यासाठी रात्री-बेरात्री शेतात जावे लागत होते. शेतात काम करतांना शेतक-यांच्या मनात नरभक्षक वाघिणीची भीती राहत होती. ही भीती दूर करून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार आणि किशोर तिवारी यांनी या परिसरात दिवसाचे भारनियमन बंद करण्यासाठी पाऊले उचलली. याबाबत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून 16 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आता या परिसरात ओलित करण्यासाठी शेतक-यांना दिवसा दहा तास वीज देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना घाबरण्याचे कारण नाही. या निर्णयामुळे खरीप हंगामातील कापूस, तूर, सोयाबीन तसेच रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल