पालकमंत्र्यांनी घेतली कालवे सल्लागार समितीची बैठक
यवतमाळ, दि.
20 : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री
मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार
पडलेल्या या बैठकीला शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हाधिकारी
डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सिंचन विभागाचे अधिक्षक
अभियंता राजेंद्र काटपिल्लेवार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी
उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी पाणीसाठा मुबलक
असल्यामुळे पाण्याचे नियमित आरक्षण ठेवा. पाण्याची मागणी आली तसे पाणी सोडण्याचे
नियोजन करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. सिंचन
विभागाने पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शेतक-यांकडून
जेथे पाण्याची मागणी येत असेल तेथे शेतीसाठी पाणी सोडावे. जो पाणीसाठा उपलब्ध आहे,
त्यातून आता रब्बीचे व्यवस्थित नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यावेळी प्रकल्पाचे
वार्षिक पाणी नियोजन करणे, प्रकल्पांची निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन
क्षेत्र यातील तफावतीबाबत उपाययोजना सुचविणे, प्रकल्पाच्या संपूर्ण लाभक्षेत्रात
पाणी वापर संस्था निर्माण करणे, तसेच अडीअडचणीवर चर्चा करून सल्ला देणे, पाणीपट्टी
थकबाकी, लाभक्षेत्रात शेतका-यांचे मेळावे, शेती प्रदर्शने, तज्ज्ञांची व्याख्याने
आयोजित करण्याबाबत चर्चा आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला सिंचन
विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment