केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतला पांढरकवडा येथे विविध विषयांचा आढावा
यवतमाळ, दि. 15 : केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पांढरकवडा येथील नगर पालिकेच्या सभागृहात विविध
विषयांचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी
बोदकुरवार, नगराध्यक्षा वैशाली लहाणे, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी,
अण्णासाहेब पारवेकर, पंचायत समिती सभापती
मेसेवार, उपसभापती बोडेवार, सदस्य शिला मेश्राम, राकेश नेमणवार, संतोष चिंतावार,
शंकर सामृतवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात
रेती घाट बंदीबाबत चर्चा करतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, शासनाने
पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आलेली
रेती घरकुल योजनेकरीता वापरण्यात येत आहे. पालिका क्षेत्रात विद्युत खांब
कनेक्शनसाठी बाकी आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितल्यावर मार्च 2018 पर्यंतचे सर्व कनेक्शन पूर्ण करण्यात येतील. तसेच ज्या
गावांनी प्रथम डिमांड भरली आहे, त्या गावाला प्राधान्याने प्रथम कनेक्शन द्यावे,
अशा सुचना त्यांनी विद्युत विभागाच्या अधिका-यांना केल्या. यावेळी पांढरकवडा
शहरातील अंडरग्राऊंड विद्युत लाईनबाबत चर्चा झाली.
प्रधानमंत्री
कृषी संजीवनी योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतक-यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून
द्यावी. कृषी विभाग तसेच इतर योजनांबाबत पंचायत समितीच्या पदाधिका-यांना संबंधित
विभागाने माहिती द्यावी, अशा सुचनाही हंसराज अहीर यांनी केल्या. यावेळी बांधकाम
विभागाचा आढावा घेण्यात आला.
तालुका स्तरावर किती
पाणी पुरवठा योजना सुरू आहे व किती बंद आहे, याबाबत विचारणा केली असता बंद
असलेल्या सर्व योजना तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी विविध
विषयांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला
झरी जामणी, पांढरकवडाचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुक्यातील सर्व सरपंच,
तलाठी, ग्रामसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment