भूकंप परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना
v
अफवांवर
विश्वास न ठेवण्याचे आवाहन
v
मदतीकरीता
नियंत्रण कक्ष क्रमांक 07232-240720 व 07232- 255077
यवतमाळ,
दि. 22 : जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, महागाव, घाटंजी, आर्णि आणि दारव्हा
तालुक्यातील 24 गावांमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार दि. 21 जून रोजी रात्री 9.22
वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यात उमरखेड तालुक्यातील कुरळी, नारळी, बोरगाव,
साखरा, निंगनूर, अकाली, मल्याळी, ढाकणी, बिटरगाव, खरुस, चातारी, एकांबा,
टेंभुरदराच, आर्णि तालुक्यातील राणी, धानोरा, अंजनखेड, साकूर, मुकिंदपूर, महागाव
तालुक्यातील हिवरा संगम, इंजनी, घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा, कुरली, दिग्रस
तालुक्यातील सिंगद आणि दारव्हा तालुक्यातील खोपडी या गावांचा समावेश आहे. हा भूकंप
रिक्टर स्केलवर 3.7 तिव्रतेचा होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये
निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावे किंवा
काय करू नये, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाने केले आहे.
भूकंपादरम्यान काय
करावे : भूकंप परिस्थिती निर्माण झाल्यास अधिकाधिक सुरक्षित
राहण्याचा प्रयत्न करावा. कधीकधी सुरवातीला भूकंपाचा लहान धक्का बसतो त्यानंतर
त्याची तिव्रता वाढण्याची शक्यता असते, अशावेळी कमीतकमी हालचाल करून सुरक्षितस्थळी
पोहचावे आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत घरात / वास्तुत थांबावे व लगेच बाहेर पडून
सुरक्षित जागी जावे.
घरामध्ये असल्यास
पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : त्वरीत जमिनीवर बसावे. अभ्यासाचे
टेबल किंवा कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली स्वत:ला झाकून घ्यावे आणि जमिनीची
हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबावे. आसपास टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या
एखाद्या कोप-यात खाली बसून दोन्ही हात घुडघ्याभोवती गुंडाळून त्यात चेहरा झाकून
घ्यावा. आतल्या दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून
स्वत:चे रक्षण करा. काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणा-या
कोणत्याही गोष्टींपासून लांब रहावे. भूकंपाच्या वेळेस अंथरुणात असल्यास स्वत:चे
डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा. मात्र छतावर असलेली एखादी वस्तू खाली
कोसळत नाही, याची खात्री करावी. अशा वेळी एखाद्या सुरक्षित ठिकाणी जावून थांबावे.
जवळ असणा-या एखाद्या प्रवेशद्वाराचा निवा-यासाठी वापर करा. मात्र या
प्रवेशद्वाराचा मजबूत आधार मिळेल, याची खात्री करून घ्यावी. जमिनीची हालचाल
थांबेपर्यंत आतच थांबावे व नंतर बाहेर जावे. भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर
ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतांना जखमी होतात, असे संशोधनातून आढळून आले आहे. भूकंप
आल्यानंतर वीज पसरू शकते किंवा स्प्रिंकलर सिस्टम्स किंवा फायर अलार्म सुरू होऊ
शकतात.
घराबाहेर असल्यास :
भूकंपाच्या वेळेस घराबाहेर असाल तर आहे त्या जागेवरून कुठेही हलू नका. मात्र
इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर रहावे. मोकळ्या जागेवर असल्यास
भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत तेथेच थांबावे. इमारतीबाहेरची जागा, बाहेर पडण्याची
ठिकाणे आणि बाहेरील भिंतीशेजारी मोठा धोका असतो. भूकंपाचा परिणाम म्हणून ब-याचदा
भिंती कोसळतात, काचा फुटतात आणि वस्तू जागेवरून पडतात.
भूकंपाच्या
वेळी चालत्या वाहनांत असाल तर सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि
वाहनाच्या आतच थांबा. मात्र इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. भूकंपाचे
धक्के थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरू करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि
उतारावरून जाण्याचे टाळा.
ढिगा-याखाली
अडकले असाल तर काडी पेटवू नका. धुळीखाली असतांना हालचाल करू नका किंवा ढिगा-याला
लाथा मारू नका. हातरुमाल किंवा कपड्याने आपले तोंड झाकून घ्यावे. जवळचा पाईप किंवा भिंत वाजवा
जेणेकरून बचाव कार्य करणा-यांना शोध घेता येईल. एखादी व्यक्ती जवळ असेल तर शिटी
वाजवा. शेवटचा उपाय म्हणून आरडाओरड करा. पण असे करतांना शरीरात धूळ जाण्याची
शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मदतीकरीता यवतमाळ जिल्हा
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 07232-240720 व 07232- 255077 यावर संपर्क साधा,
असे प्रशासनाने कळविले आहे.
भूकंपासारख्या
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी गावात भेटी देऊन नागरिकांना
धीर द्यावा. तसेच अफवा पसरविल्या जाणार नाही
व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणर नाही, याची काळजी घ्यावी, अशा
सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
00000000
Comments
Post a Comment