हार, तु-याने स्वागत नको गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या भेट द्या
v आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक
उईके यांचे आवाहन
यवतमाळ,
दि. 21 : राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा
त्रस्त आहे. यावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मंत्रीपद मिळाल्यामुळे
सामान्य नागरिक व कार्यकर्ते आनंदी असले तरी दुष्काळाच्या परिस्थितीची मला जाणीव
आहे. त्यामुळे जनतेने भेटीला येतांना स्वागतासाठी हार व पुष्पगुच्छ न आणता वह्या
भेट द्याव्यात. जेणेकरून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला
सामाजिक हातभार लाभेल, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी निवेदनातून
केले आहे.
डॉ.
अशोक उईके यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर 23 जून
रोजी प्रथमच ते जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे
की, शेतकरी आणि सामान्य माणसाचे दुःख काय असते, याची मला जाणीव आहे. मंत्रीपद
मिळाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला झालेला आनंद मी अनुभवत आहे. मात्र याचा बडेजाव न
करता नागरिकांनी दुष्काळी स्थिती लक्षात घेता हार व पुष्पगुच्छऐवजी वह्या देऊन
स्वागत केल्यास मला जास्त आनंद होईल. विशेष म्हणजे शैक्षणिक सत्राला आता सुरवात
होत असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी या वह्यांचा
चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी हार व तु-यात
पैसे न गमावता एका सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. अशोक उईके
यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment