आदर्श गाव स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या गावांना जिल्हाधिकारी व सीईओंच्या भेटी




v नांझा, गणेशवाडी व देवनाळा गावात नागरिकांशी संवाद
यवतमाळ, दि. 23 : आदर्श ग्राम बनविण्याच्या उद्देशाने संपूर्ण राज्यात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील एक हजार गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट असून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून विकास कामाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून आदर्श ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेकरीता पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील गावांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी भेटी देऊन गावक-यांशी संवाद साधला.
गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, घरकुल, आरोग्य, कृषी विकास व विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व गावकरी यांच्यात समन्वय साधने हे अभियानाचे महत्वाचे उद्दिष्ट असून त्यानुसार कार्य पूर्ण करणाऱ्या गावामध्ये आदर्शग्राम  स्पर्धा राबिण्यात येत आहे. स्पर्धेच्या प्राथमिक मुल्यांकनात नांझा गावाला सर्वात जास्त गुण मिळाले असून त्या पाठोपाठ गणेशवाडी व देवणाळा गावसुद्धा स्पर्धेत आहे. येथील गावक-यांचा उत्साह वाढावा, गावक-यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी नांझा, गणेशवाडी आणि देवनाळा येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
लोकांचा ग्राम विकासात असाच सहभाग कायम राहावा व गाव स्पर्धेत टिकावं. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून गावासोबत जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर झळकावे, अशा शुभेच्छा यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. आदर्श लोकांच्या संघटनेतून गाव आदर्श होताना आम्हाला आनंद होत आहे. जिल्हा प्रशासन म्हणून गावांना आम्हीही तेवढ्याच जोमाने सहकार्य करू, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक राजेश  कुलकर्णी यांनी गावक-यांना मार्गदर्शन केले. तसेच आदर्श गाव बनविण्यासाठी उपस्थितांना संकल्प व शपथ दिली. 
या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करणारे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक सूरज चौधरी यांचा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, कळंबचे तहसीलदार सुनील पाटील, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ठाणेदार विजय राठोड, रिलायन्स फाऊंडेशनचे संदीप वायाळ, विस्तार अधिकारी केळकर,  सरपंच उषा बुरबुरे,  शेषराव मडावी, विनोद तुरणकर, सुरेश ठाकरे, विठ्ठल तोडसे, वर्षा वडे, ज्योती आत्राम,  रेखा हस्तबांधे, वेणू किनाके, वेणू मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल