जिल्हाधिका-यांनी घेतली शांतता समितीची बैठक
यवतमाळ, दि. 17 : कोरोना
संकटाच्या काळात आलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी एम.
देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक पार
पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार
व-हाडे, अपर पोलीस अधिक्षक खांडेराव धरणे तसेच जिल्ह्यातील
शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, यावर्षीच्या
दुर्गा उत्सवाकरीता जिल्हा प्रशासनावर केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याची
जबाबदारी नसून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये लोकांच्या आरोग्याचीसुद्धा काळजी
घेण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे यात शांतता समितीच्या सदस्यांची भूमिका
महत्वाची आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत आलेले
सर्व सण/ उत्सव लोकांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने साजरे करण्यात आले.
जिथे गर्दी तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त, असे समीकरण आहे. त्यामुळे यावर नियंत्रण करण्यासाठी दुर्गा उत्सव
काळात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दुर्गा पुजा मंडळांनी
मंडपामध्ये रजिस्टर ठेवावे. तसेच
मंडपामध्ये येणा-या प्रत्येकाची पल्स ऑक्सीमिटर व थर्मल स्कॅनरने
तपासणी करुन रजिस्टरमध्ये नावासह नोंद करावी. कोणाबद्दल शंका असल्यास ताबडतोब रुग्णालयात
संपर्क साधावा. विशेष म्हणजे दुर्गा मंडळे जी वर्गणी जमा करतात त्यातून पल्स ऑक्सीमिटर
व थर्मल स्कॅनर घेण्याचे नियोजन करावे.
जिल्हाधिकारी पुढे
म्हणाले, ज्या गावात दुर्गा उत्सव साजरा होणार आहे त्या गावात मोबाईल क्लिनीक
व्हॅन पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. मंडपामध्ये पाच व्यक्तीच्या वर कोणीही हजर
राहणार नाही व गर्दी होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. मंडपामध्ये
लाऊडस्पीकर व डीजेची परवानगी देण्यात येऊ नये. दुर्गा उत्सव
काळात मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क न लावता व शारीरिक अंतर न पाळता कोणताही
कार्यक्रम होणार नाही याची याकडे मंडळांनी विशेष लक्ष द्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
गरबा व दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. तसेच दुर्गा विसर्जन व
दस-याचे दिवशी रावणदहन करण्यात येऊ नये. दुर्गा मंडळांनी रक्तदानासारखे आरोग्यविषयक
कार्यक्रम आयोजित करावे. आरोग्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी
मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. शांतता समितीच्या सदस्यांना
दोन दिवसात ओळखपत्र निर्गमित करावे. तसेच शांतता समितीच्या
सभेचे दर तीन महिन्यांनी आयोजन करावे, अशा सुचना त्यांनी निवासी
उपजिल्हाधिका-यांना दिल्या.
यावेळी बोलतांना पोलिस अधिक्षक म्हणाले, दुर्गा उत्सव साजरा करण्याकरीता शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले असून सदर शासन परिपत्रकाची प्रत शांतता समितीच्या
सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या आहेत.
त्यानुसार सदस्यांनी त्यांचे क्षेत्रात या मार्गदर्शक सूचनांची
अंमलबजावणी केली जात असल्याबाबत शासकीय अधिका-यांच्या मदतीने खात्री करावी. दुर्गा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावयाचा
आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका
काढण्यावर बंदी आहे. तसेच आगमन व
विसर्जनाचे मार्ग यावर्षी बदलले आहे. त्याच
मार्गाने सर्व मंडळांनी आगमन व विसर्जन करावयाचे आहे. तसेच आगमन व विसर्जनाकरिता
गर्दी होणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी. दुर्गा
उत्सवामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी.
कुठेही शांतता भंग होण्याचे प्रसंग घडणार असल्यास त्या ठिकाणच्या शांतता समित्यांनी
वेळीच खबरदारी घेऊन शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर
यांनी केले. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस उपअधिक्षक, संबंधित पोलिस
निरीक्षक यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित
होते.
Comments
Post a Comment