पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे वाढणार सिंचन विहिरींची संख्या

 


Ø ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार मंजूर होणार विहिरी

यवतमाळ, दि. 20 : शेतक-यांना दिलासा देण्यासाठी गावागावात पांदण रस्त्यांची मोहीम मिशन मोडवर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता जिल्ह्यात सिंचनाचा अनुषेश पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढकार घेतला आहे. शेतक-यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून आता गावागावात सिंचन विहिरींची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात विहिरींची संख्या मंजूर करण्यात येईल.

जिल्ह्यात सिंचनाची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ मान्सूनच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. पाऊसही बेभरोश्याचा असल्यामुळे शेतक-यांच्या हाती पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न येत नाही. परिणामी वर्षभर त्यांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतक-यांना दुबार पीक घेणे शक्य होईल. याच अनुषंगाने एका गावात केवळ पाच सिंचन विहिरींना मंजुरी ही पूर्वीची अट शिथिल करण्यात आली असून आता ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात सिंचन विहिरी मंजूर होणार आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात येणार आहे. यात 1500 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पाच सिंचन विहिरी, 1500 ते 3000 लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये 10 विहिरी, 3000 ते 5000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत 15 विहिरी तर पाच हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 20 सिंचन विहिरी मंजूर करण्यात येईल, असे परिपत्रकात नमुद आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी