गर्दी नियंत्रणासाठी कलेक्टर, सीईओ आणि एसपी रस्त्यावर
Ø वरिष्ठ
अधिका-यांसह यंत्रणेचा शहरातून तीन तास फेरफटका
यवतमाळ,
दि. 16 : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण वाढत असून पॉझेटिव्हीटी रेट कमी होत
आहे. यात सातत्य राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र अजूनही काही
नागरीक विनाकारण फिरत असून गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे
शहरातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच निर्बंधाचे पालन योग्य प्रकारे होते की नाही,
याची तपासणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे चक्क
रस्त्यावर उतरले.
वरीष्ठ अधिका-यांसह संपूर्ण यंत्रणा
यवतमाळ शहरातील एसबीआय चौकातून मेन लाईन, मारवाडी चौक, आठवडी बाजार व इतर
बाजारपेठेच्या मार्गावर तब्बल तीन तास मार्गक्रमण करीत होते. यात शासन आणि
प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे अत्यावश्यक सेवांचीच दुकाने दिलेल्या ठराविक वेळत
सुरू आहे की नाही. कोणत्या दुकानासमोर अनावश्यक गर्दी तर नाही, दुकानदार तसेच
ग्राहकांकडून सुचनांचे पालन होत की नाही, आदींची त्यांची पाहणी केली. तसेच काही
किराणा दुकानदारांसोबत संवादही साधला.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.
येडगे म्हणाले, किराणा दुकानदारांनी ग्राहकांचे व्हॉट्सॲप / मोबाईल क्रमांक घेऊन
घरपोच डिलीव्हरी देण्याचे नियोजन करावे. जेणकरून दुकानात गर्दी होणार नाही. तसेच
विनाकारण दुचाकीवर फिरणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यावर पोलिस विभागाने
कारवाई करावी. नागरीक विनाकारण फिरत राहिले तर येणा-या संभाव्य लाटेसाठी आपणच
जबाबदार राहू. यात मग लहान मुलांनाही संसर्ग होण्याचा धोका राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी
अनावश्यकपणे फिरू नये. तसेच कोव्हीडच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करून
प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी
अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर,
न.प. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment