केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
यवतमाळ, दि. 15 : केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत आढावा
बैठक घेतली. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,
निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जि.प.सदस्य प्रकाश राठोड, राजेंद्र डांगे
आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, ज्या बँका पिककर्ज वाटप करत नाही, त्यांना 1
आठवड्याची मुदत द्यावी. तसेच जुलै अखेरपर्यंत संपूर्ण कर्जवाटपाचे बँकांनी
उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना वेळेवर पिककर्ज मिळाले तर शेतकरीसुध्दा वेळेवरच
बँकांना कर्ज परत करतील. कर्जवाटपाचे काम ज्या बँकेचे कमी आहे, त्या बँकांनी सकाळी
1 तास व सायंकाळी 1 तास कामकाज वाढवावे जेणेकरून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा
करण्यात येईल.
प्रधानमंत्री मुद्रा बँक
योजना ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत कर्ज वाटप
समाधानकारक नाही. त्यामुळे बँकांनी शाखानिहाय मुद्रा कर्जवाटपाचे उद्दिष्ट हाती
घेतले पाहिजे. नियोजन विभागाचा आढावा घेतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणाले,
186 प्रस्तावित कामांपैकी 86 कामे मंजूर होवून 3 कोटी 55 लक्ष रुपये खर्च करण्यात
आले आहे. तसेच 38 व्यायाम शाळांना साहित्यसह मंजूरी देण्यात आली आहे. खासदार
निधीचे प्रस्ताव तात्काळ पूर्ण करण्यात यावे. खनिकर्म निधीमधून वणी येथे डिजीटल
स्कुल तात्काळ पूर्ण करावी. नालासरळीकरण, खोलीकरण प्रस्तावाला त्वरीत मान्यता
देण्यात यावी. ग्रामिण पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रत्येक बाधित गावामध्ये आरओ,
एटीएम उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक बाधित ग्रामपंचायतीला 10 केव्हीचे सौरऊर्जा
लाईट लावावे. तसेच तालुक्यातील आश्रमशाळा, वसतीगृह, प्राथमिक आरोग्य
केंद्रांनासुध्दा सोलर लाईट द्यावे. खनिकर्म निधीमधून पांदन व रस्ते आदी कामे
त्वरीत पूर्ण करावी, असे आदेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
यावेळी जिल्हा नियोजन
अधिकारी श्री.राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्यासह विविध
विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment