सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणीकरीता जास्तीत जास्त नमुने पाठवा – जिल्हाधिकारी सिंह



                                            

Ø पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 21 : दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तिचा शोध घेणे आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या तसेच आरोग्य सर्व्हेमध्ये आढळलेल्या प्रत्येकाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले तर मानवी साखळी तोडण्यास मदत होईल. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त नमुने तपासणीकरीता पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय यंत्रणेशी व्हीसीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

यवतमाळ येथील विषाणु संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान 25 ते 30 नमुने तपासणीकरीता आले पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जेवढ्या जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी होईल, तेवढे नागरिकांच्या दृष्टीने चांगलेच आहे. एका पॉझेटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील किमान 30 नमुने आलेच पाहिजे. यासाठी हाय-रिस्क, लो -रिस्क, आणि लो टू लो-रिस्क असे तीन भागात वर्गीकरण करा. पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचे योग्य ट्रेसिंग केले तर प्रादुर्भाव पसरण्यास आळा बसेल. याशिवाय आरोग्य तपासणीदरम्यान ज्यांना तीन दिवस नियमित ताप, खोकला व इतर लक्षणे आढळल्यास अशाही व्यक्तिंचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा.

पॉझेटिव्ह आलेला रुग्ण ज्या भागात राहत असेल तो भाग त्वरीत प्रतिबंधित करावा. या भागातील एकही व्यक्ति आरोग्य तपासणीमधून सुटता कामा नये. ग्रामस्तरीय समिती काळजीपूर्वक काम करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिचे तालुकास्तरावर ऑडीट करावे. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यापूर्वी सदर व्यक्ती उपचाराकरीता कोणत्या खाजगी दवाखान्यात गेला होता का. त्या खाजगी डॉक्टरांनी त्वरीत आरोग्य यंत्रणेला का कळविले नाही, याबाबत समितीने विचारणा करावी. कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये पॉझेटिव्ह असलेले मात्र ज्यांना लक्षणे नाही, असे रुग्ण तेथेच बरे होऊन घरी गेले पाहिजे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने काळजीपूर्वक काम करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामस्तरीय समितीकडून सारी आणि आयएलआय तपासणीमध्ये अनेक कमतरता आहे. समितीतील सदस्यांनी अचूक सर्व्हे करून आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. तसेच तालुकास्तरीय यंत्रणेने ग्रामस्तरीय समितीमधील सदस्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशा सुचना केल्या.

व्हीसीद्वारे संवाद साधतांना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित ठाणेदार आदी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी