जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु




Ø आठ जण नव्याने पॉझेटिव्ह तर तीन जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 6 : सोमवारी आणखी एका कोरोनाबधित रुग्णाचा झाल्याने जिल्ह्यात मृत्युंचा आकडा 12 वर पोहचला आहे. आज (दि.6) दिवसभरात आठ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय मृतकाचा समावेश आहे. तर इतर सात जणांमध्ये यवतमाळ येथील पुरुष आणि उर्वरीत सहा जण दिग्रस येथील आहे. यात तीन महिला व तीन पुरुष आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता. यात आज आठ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या 75 वर गेली. यात एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या 74 झाली होती. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या तीन जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71 झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 96 जण भरती आहे. 

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 87 रिपोर्ट प्राप्त झाले. यात आठ पॉझेटिव्ह आणि 79 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 329 वर पोहचला आहे. यापैकी 246 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 12 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 92 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 5982 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5427 प्राप्त तर 555 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5098 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

यवतमाळ शहरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिका-यांची पाहणी : काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा हळूहळू या विषाणुच्या संसर्गाच्या रडारवर येत आहे. यवतमाळ शहरात एक-दोन, एक-दोन पॉझेटिव्ह रुग्ण नियमित आढळत आहे. त्यामुळे शहरात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढविण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे सोमवारी या भागात प्रत्यक्ष दाखल झाले. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यामुळे नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. प्रशासनाच्या सुचनांचे गांभिर्य त्यांना दिसून येत नसून नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. कोणताही निष्काळजीपणा स्वत:च्या तसेच दुस-याच्या जीवावर बेतू शकतो.

नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरू नये. तसेच कुठेही गर्दी करू नये. बाहेर जातांना नियमित मास्कचा वापर करावा. 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील नागरिक यांची काळजी घ्यावी. हात वारंवार स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी त्यांनी शहरातील गुरुदेव नगर, नेताजी चौक, दत्त मंदीर वडगाव, तायडे नगर, रचना सोसायटी, कन्यका सोसायटी या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा आदी उपस्थित होते.

 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी