कोरोना : महिला व बालविकास मंत्र्यांची प्रशासनासोबत चर्चा
यवतमाळ, दि. 7 :
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील कोरोना
उपाययोजनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या या चर्चेवेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज
शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंह, डॉ. मिलिंद
कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी
ललितकुमार व-हाडे, आमदार डॉ. वजाहत मिर्झा आदी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने
अतिशय उत्तमरित्या कोरोनाची परिस्थिती हाताळली आहे. 12 मार्च पासून 29 मे पर्यंत
जिल्ह्यात एकही मृत्यु झाला नाही. सुरवातीपासून वरिष्ठ अधिकारी प्रतिबंधित
क्षेत्रात ऑनफिल्ड आहे, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे, असे त्या म्हणाल्या.
कोरोनाच्या या संकटात प्रत्येक नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन
करावे. तसेच स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी
श्री. सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्राची माहिती, नमुने तपासणी, नागरिकांची आरोग्य
पथकाद्वारे तपासणी, फिवर क्लिनीक, मोबाईल फिवर क्लिनीक, मुख्यालयातील वरिष्ठ
अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर, रुग्णांची संख्या, विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये
म्हणून प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना आदींबाबत महिला व बालविकास
मंत्र्यांना अवगत केले.
याप्रसंगी पीक कर्जवाटप,
सोयाबीन बियाणांच्या तक्रारी, कुमारी मातांचा प्रश्न आदींबाबत चर्चा करण्यात आली.
०००००००
Comments
Post a Comment