शासकीय आदिवासी वसतीगृहात सर्व जागा फक्त आदिवासी विद्यार्थ्यांकरीता राखीव
* खास बाब अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत
सुधारणा
यवतमाळ दि. 4 : आदिवासी विकास विभागामार्फत
राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर
माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, याकरीता शासकीय
आदिवासी वसतीगृहे कार्यरत आहेत. या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना खास बाब
अंतर्गत प्रवेश देण्याबाबत तरतूद करण्यात आली असून प्रवेश प्रक्रियेच्या सध्याच्या
तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या सुधारणेनुसार आदिवासी विभागाच्या वसतीगृहातील इतर
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवण्याची सर्वसाधारण तरतूद रद्द
करण्यात आली आहे. यापुढे राज्यातील सर्व शासकीय आदिवासी वसतीगृहांमध्ये सर्व जागा
फक्त आदिवासी विद्यार्थ्यांमधूनच भरण्यात येतील. मुला-मुलींच्या प्रत्येक शासकीय
वसतीगृहात प्रत्येक वर्षी रिक्त होणा-या जागांपैकी 5 टक्के जागा अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांमधूनच ‘खास बाब’ म्हणून शासन स्तरावरुन भरल्या जातील. यासाठी विद्यार्थ्यांना www.swayammahaonline.gov.in या
संकेतस्थळावर अर्ज करणे बंधनकारक आहे.
खास बाब म्हणून प्रवेश देतांना वसतीगृहात फक्त
अभ्यासक्रमाच्या कालावधीतच प्रवेश देण्यात येईल.
या संदर्भात विद्यार्थ्यांच्या याद्या शासन स्तरावरून मंजूर करून संबंधित
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना 30 सप्टेंबरपर्यंत पाठविण्यात
येणार आहे. यानंतर खास बाब अंतर्गत या जागा विना आरक्षित समजून संबंधित प्रकल्प
अधिकारी यांनी त्या जागा 3 ऑगस्ट 2004 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरण्याची
कार्यवाही करावी. तसेच रिक्त जागेअभावी वसतीगृहात प्रवेश देणे शक्य नसलेल्या
विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प अधिकारी यांनी स्वयंम योजनेकरीता विचारात घ्यावे,
अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
यवतमाळ येथे अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र समिती कार्यालय : अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र तपासणीची प्रक्रिया
अधिक गतीमान व सुलभ करण्यासाठी यवतमाळ येथे नवीन समिती कार्यालय स्थापन करण्यास
मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रलंबित व नव्याने दाखल होणारी प्रकरणे
तातडीने निकाली काढण्यास मदत होईल.
००००००
Comments
Post a Comment