समाधान शिबीरातून पालकमंत्री सोडविणार नागरिकांच्या समस्या
· नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित तहसिल कार्यालयात सादर कराव्या
यवतमाळ दि. 19 ऑक्टोबर (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे आयोजनातून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. याकरिता नागरिकांनी आपल्या तक्रारी 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संबंधित तहसिल कार्यालयात सादर कराव्या, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले आहे.
नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, घाटंजी, केळापूर या तालुक्यांसाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी व मारेगाव, वणी, झरीजामणी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, यवतमाळ या तालुक्यांसाठी दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी यवतमाळ येथे सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय “समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.
समाधान शिबीराकरिता प्रत्येक तहसिल कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून तेथे तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी सदर कक्षात आपल्या तक्रारी सादर करून टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. दिलेल्या तक्रारीवर संबंधीत विभागातर्फे कार्यवाही करण्यात येईल. तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा समाधान शिबीरात पालकमंत्री घेणार आहे.
Comments
Post a Comment