अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर शोध व बचाव पथकाची यशस्वी कारवाई मध्यरात्री पाच तास चालली बचाव मोहिम

यवतमाळ, दि.१६ (जिमाका) : अडान नदीला आलेल्या पुरामुळे घाटंजी तालुक्यातील कोपरीजवळ एक व्यक्ती अडकून पडली होता. प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर काल मध्यरात्री तब्बल पाच तास बचाव मोहीम राबवून सदर व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे. कोपरी येथील भाऊराव सातघरे हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी कोपरीजवळ अडान नदीपात्रात गेले होते. अचानक नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे ते तेथे अडकून पडले. दरम्यान ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती. याची माहिती पोलिस पाटील श्रीमती निलावर यांनी रात्री १२ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली. या प्रकरणाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती घेवून आपत्ती व्यवस्थापन विभागास सर्व सहित्यानिशी पथक रात्रीच रवाना करण्याचे निर्देश दिले व अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्याची सूचना केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथकाने अवघ्या ५० मिनीटात घटनास्थळ गाठून मोहीम सुरू केली. नदीची वाढणारी पाणी पातळी आणि त्यात रात्रीची वेळ यामुळे प्रारंभी अडथळे आले परंतू शेवटी पथकास यश आले. तब्बल पाच तास अस्का लाईटच्या मदतीने शोध मोहिम राबवून सदर व्यक्तीस सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पथकातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मोहिम घाटंजीचे तहसिलदार विजय साळवे, अतिरिक्त तहसीलदार मोहनिस शेलवटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्या उपस्थितीत शोध व बचाव पथक प्रमुख किशोर भगत यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत मंडळ अधिकारी श्री.चावरे, पोलिस पाटील श्रीमती निलावर, पोलिस कर्मचारी सुमित सोनवणे, निरज पातुरकर, धीरज गावंडे , यशवंत गिरी, लखन कैथवास, पुकार वाकोडे, कमलेश काकडे, शेख मुनीर, विवेकानंद आमुखे, स्वप्नील सबाल, राम मस्के, अमोल ढोके आदींचा सहभाग होता. नागरिकांनी सतर्क रहावे - अमोल येडगे सततच्या पावसामुळे नाले, ओढे पूर्ण क्षमतेने वाहत आहे. तसेच काही प्रकल्पातून पाणी सोडले जात असल्यामुळे ग्रामस्तरीय समित्या व नागरिकांनी सतर्क रहावे. कार्यकारी अभियंत्यांना धरणातून पाणी सोडावयाचे असल्यास तहसिलदारांशी समन्वय साधावे. नदी, नाले, ओढे, पुल यावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी त्यातून जाण्याचे टाळावे, मासेमारी, पुलावरुन पाणी वाहत असताना दुचाकी टाकने इत्यादी प्रकार टाळावेत. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी