राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे- जिल्हाधिकारी
यवतमाळ,दि.११ जुलै(जिमाका):- खरीप हंगाम सुरू झाला असुन शेतक-यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. अशावेळी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे. जेणेकरून शेतक-यांना पेरणी व इतर शेती कामासाठी सदर निधी उपयोगी पडेल.सर्व पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाची स्थिती सुधारावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बँकर्स समीक्षा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मार्च २०२३ अखेर संपलेल्या बँकिंग तीमाही आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. सदर बैठकीला जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक अमर गजभिये, भारतीय रिझर्व बॅंकेचे राजकुमार जयस्वाल,जिल्हा विकास अधिकारी,नाबार्ड दीपक पेंदाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती वैशाली रसाळ, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे,उप क्षेत्रीय प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रतिभा बहादुरकर, बँक ऑफ बडोदाचे आर.एम.सोमकुवर,भारतीय स्टेट बँकचे सुनील सराटे,युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रतीक कुमार,बँक ऑफ महाराष्ट्रचे अमित नागदिवे,विदर्भ कोंकण ग्रामीण बँकचे पवन हेमनानी,संचालक कु.श्रृती शेंडे,तसेच इतर विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सन-२०२२-२३ अखेर झालेल्या आर्थिक वर्षातील सर्व सरकारी प्रायोजित उपक्रम व प्राथमिक क्षेत्रातील कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला.
खरीप हंगामाला सुरुवात होताच शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धाव घेतो, पूर्ण कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या सर्विस एरियातील गावांच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करावे. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात दिरंगाई करतील किंवा विनाकारण त्रास देतील, अशा बँकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल,असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. पीक कर्जामध्ये मागे असलेल्या बॅंकांनी सूक्ष्म नियोजन करावे व सर्व पात्र शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करून त्यांना योग्य वेळी खरीप हंगामा करीता उपयोगी ठरेल असे नियोजन करावे असे सांगितले.
प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती वैशाली रसाळ यांनी सर्व जिल्हास्तरीय बँकांनी उमेद अंतर्गत कर्ज प्रकरण लक्षांकाच्या १२५ टक्के कर्ज स्वीकृत करून वाटप केलेला आहे,त्याबद्दल माहिती दिली. तसेच सन-२०२३-२४ जिल्हयाला मिळालेले उदीष्टे रु. ३१०.९८ कोटी आहे, ते सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सन- २०२३-२४ वर्षाच्या वार्षिक ऋण आराखडा पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण प्राथमिक क्षेत्रा करिता रु.५४२५ कोटी व गैर प्राथमिक क्षेत्राकरिता रू.१५०० कोटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. एकूण वार्षिक आराखडा रू. ६९२५ कोटीचा आहे,अशी माहिती अमर गजभिये यांनी दिली.
यावेळी सर्व शासकीय योजनांच्या आढावा घेतना जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम पीक कर्ज वाटपांच्या यंदाचा आपल्या जिल्ह्याचा पीक कर्ज आज पर्यंत सर्व बँकांनी मिळून खरीफ हंगामा करीता रु.१६९८ कोटी वाटप केलेले आहे. उर्वरित उदीष्ट हे जुलै महिन्यात सर्व बँकांनी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच महात्मा फुले मागास्वर्गीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ व इतर मागासवर्गीय महामंडळाच्या योजनांच्या आढावा घेण्यात आला. त्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र यांनी तालुकास्तरावर सर्व लाभार्थी व पात्र उमेदवारांचे मेळावे आयोजित करून बँकांतर्फे लवकरात लवकर कर्ज वाटप करण्याचे सुनिश्चित करावे. त्याचप्रमाणे विविध मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज प्रकरण अजूनही बँकांच्या कोड मध्ये प्रलंबित आहे ते प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावित, असे जिल्हाधिकारी यांनी विविध योजनेच्या विषयाचा आढावा घेताना संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
Comments
Post a Comment