बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती सप्ताहाचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन* 20 नोव्हेंबरपर्यंत करणार जनजागृती
यवतमाळ दि. 16 नोव्हेंबर (जिमाका):- बालकामगार या अनिष्ट प्रथेतून राज्याला मुक्त करण्याचा निर्धार शासनाने केलेला असुन कामगार विभागाद्वारे 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते महसुल भवन येथे करण्यात आले.
कोणत्याही आस्थापना धारकांनी आपल्या आस्थापनेमध्ये बालकामगार ठेवू नये, सर्व आस्थापना धारकांची व देशातील प्रत्येक नागरीकांची सामाजिक जबाबदारी असून आपला जिल्हा,आपले राज्य व आपला देश बालकामगार मुक्त करण्याकरिता आपली सामाजिक बांधीलकी जोपासावी. तसेच यानंतर सुध्दा कोणत्याहीआस्थापनेमध्ये बाल कामगार आढळून आल्यास त्या आस्थापना धारकावर नियमानुसार कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही आस्थापना धारकांनी बाल कामगार ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले .
यावेळी सरकारी कामगार अधिकारी प्र.रा.महाले ज्योती कडू जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, देवेन्द्र राजूरकरजिल्हा बाल संरक्षण अधिकारी, र.श.जतकर दुकाने निरीक्षक, विजय गुल्हाने , दाभाडकर चाईल्ड लाईन, व ईतर विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच बालगृहातील बालके सुध्दा उपस्थित होती.
जिल्हाधिकारी यांनी 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कामावर ठेवण्यास या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यांत आलेला आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालक यांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यांस प्रतिबंध आहे असे सांगितले.
सप्ताहा दरम्यान बालकांच्या चित्रकलास्पर्धा, निबंध स्पर्धा, आस्थापनामध्ये बालकामगार काम करीत नाहीत असे भित्तिपत्रके दर्शनी भागात लावणे तसेच चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या बैठकिचे आयोजन, शाळेच्या विद्यार्थ्यांची शहराच्या मुख्य बाजारपेठेमधुन रॅली, स्वाक्षरी मोहीम इत्यादी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आलेले आहे. यादरम्यान बाल कामगार धाडसत्राचे आयोजन करुन बालकामगारांची मुक्तता करण्यांत येईल. आपल्या देशामधून बालकामगार या अनिष्टप्रथेचे समूळ उच्चाटन व्हावे ही प्रथा कायमस्वरुपी नष्ट व्हावी या उद्देशाने या कायद्याची निर्मिती करण्यांत आली. सदर कायद्याची प्रभाविपणे अंमलबजावणी करुन राज्य बालकामगार मुक्त व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालकामगार कृतीदलाची स्थापना केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बालकामगार कृतीदल कार्यरत असून सदर कृतीदलामध्ये विविध विभागाचे अधिकारी यांची समिती शासनाव्दारे स्थापन करण्यात आलेली आहे अशी माहिती प्र. रा. महाले यांनी दिली.
Comments
Post a Comment