महावितरणच्या कामावार पालकमंत्री यांची नाराजी
नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त करुन जोडण्याचे आदेश
यवतमाळ, दि २५ नोव्हेंबर, जिमाका:- सद्यस्थितीत रब्बी हंगामाला शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची गरज लक्षात घेता नादुरुस्त असलेले रोहित्र तात्काळ दुरुस्त करून तीन दिवसाच्या आत जोडणी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वीज वितरण विभागाच्या अडचणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार सर्वश्री मदन येरावार, नामदेवराव ससाने संजय रेड्डी, डॉक्टर संदीप धुर्वे, प्रा. अशोक उईके, ईंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती चव्हाण, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे महावितरणचे संचालक संजय ताकसांडे हे मुंबईतून उपस्थित होते.
शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारीबाबत आणि महावितरणच्या एकंदरीत कामकाजाबाबत आज पालकमंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याचे वनक्षेत्र बघता शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात या जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी पंपाच्या प्रलंबित जोडण्या निकाली काढण्यासाठी महावितरणने तात्काळ निविदा प्रक्रिया करून कृषी पंपाच्या जोडणी करून द्याव्यात. शेतकऱ्यांचे रोहित्र गतीने दुरुस्ती व्हावी यासाठी काही ट्रान्सफॉर्मर राखीव ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, रोहित्र खरेदीची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी अशा सुचनाश्री राठोड यांनी केल्यात.
तसेच रोहित्र दुरुस्तीसाठी 20 के. एल. ऑईल उपलब्ध करून देण्यात येईल असे संजय ताकसांडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी आणि विजेची गरज असते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त असल्यास किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास शेतकरी आपल्याला फोन करतात. ते त्रस्त असतात म्हणुन आपल्याला फोन करतात. त्यामुळे अधिकारी ,कर्मचारी यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने बोला, त्यांना व्यवस्थित समजावून सांगा त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सौजण्याची वागणूक द्या, अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्यात.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा
१६ ते २१ हजार दरमहा वेतन : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अंतर्गत जुलैमध्ये आयटीआय परीक्षेचे निकाल घोषित झालेले आहेत. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी यवतमाळच्या आयटीआयमध्ये सुझुकी मोटर गुजरात प्रा. लिमिटेड हंसलपुर, गुजरात या नामांकित कंपनीचा भरती मेळावा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित केला आहे. या कंपनीमार्फत अॅप्रेन्टीस करीता १६ हजार ९०० तसेच फिक्स टर्म करीता २१ हजार दरमहा वेतन दिले जाणार आहे. या मेळाव्यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, मोटार मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक डिझल, मेकॅनिक ट्रॅक्टर, टुल अॅण्ड डायमेकर, पिपीओ व पेन्टर जनरल व्यवसायासाठी जागा उपलब्ध आहेत. यासाठी इयत्ता १० वी मध्ये किमान ४० टक्के गुण, आयटीआयमध्ये किमान ५० टक्के गुण तसेच रूजु होतेवेळी वय १८ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. या संधीचा जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदरावांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment