रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बेंबळा प्रकल्पाचे पाणी पाणी पाळीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यामधील लाभक्षेत्रात येणारे बाभुळगाव, कळंब, राळेगांव आणि मारेगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाकडून पाणी सोडण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रब्बी हंगामात बेंबळा प्रकल्पावर फक्त तीन आवर्तन सिंचन करणार असल्याने पाणी उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कापूस या पिकासाठी व गहु ऐवजी चना या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपाळी वेळापत्रकानुसार बेंबळा कालवा १ ते १०५ किमी पर्यंतची वितरण प्रणाली राहणार आहे. दि.१९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत पाणीपाळी राहील. दि.१ डिसेंबर ते १२ डिसेंबर कालवा बंद राहील. दि.१३ डिसेंबर ते २४ डिसेंबर पाणीपाळी राहील. दि.२५ डिसेंबर ते ५ जानेवारी कालवा बंद राहील. दि.६ जानेवारी ते १८ जानेवारी पाणीपाळी राहील आणि १९ जानेवारीपासून कालवा बंद राहील.
रब्बी हंगामात ज्यांना पाणी घ्यायचे आहे, अशा लाभधारकांचे पाणी मागणी अर्ज नमुना ७, ७ अ, ७ ब मध्ये प्रवाही पद्धतीच्या सिंचनासाठी उपविभागीय अभियंता, बेंबळा पाटबंधारे उपविभाग कळंब व राळेगांव, उपविभागीय अभियंता, बेंबळा पाटबंधारे उपविभाग यवतमाळ, कळंब आणि राळेगाव या कार्यालयात अटी व शर्तीच्या अधीन राहून स्वीकारण्यात येणार आहेत. अटी शर्तीबाबतची सविस्तर माहिती बेंबळा प्रकल्प कार्यालयात किंवा ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे, असे बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment