लॉकडाऊन काळात डाक विभागाच्या वतीने 4.43 कोटी रुपयांचे वाटप
यवतमाळ, दि. 01 : गेल्या दोन
महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक संकटांशी
सामना करावा लागत आहे. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण
योजनेंतर्गत प्रत्येक जनधन खात्यात सरकारने 500 रूपये जमा केले. पैसे खात्यात तर
आले, पण काढायचे कसे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. अशा वेळी भारतीय डाक
विभागाच्या AePS म्हणजे आधार संलग्न
पेमेंट योजनेमार्फत सर्वसामान्यांना त्यांची रक्कम गावागावात उपलब्ध करून दिली. डाक
विभागाच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात 4 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले.
डाक विभागाच्या प्रत्येक
कर्मचाऱ्याने व ग्रामीण डाक सेवक यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन पैशांचे वाटप केले
आणि या महामारीच्या काळात ग्रामीण भागात खेडोपाडी मदत केली. यवतमाळ जिल्ह्यात
लॉकडाऊन काळात आजपर्यंत भारतीय डाक विभागाने एकूण 21 566 व्यक्तींना पेमेंट केले
असून ती रक्कम 4 कोटी 43 लाख ऐवढी आहे. यात यवतमाळ जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात
तिसऱ्या क्रमांकावर आहे. AePS योजनेमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारास कोणत्याही
प्रकारचे सेवा शुल्क आकारले जात नाही. डाक विभागामार्फत ही सेवा खातेदाराच्या
घरापर्यंतसुध्दा उपलब्ध आहे. तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ
डाक विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
००००००
Comments
Post a Comment