वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांना वेळेत उपचाराची संधी द्या


v जिल्हाधिका-यांचे नागरिकांना भावनिक आवाहन

यवतमाळ, दि. 16 : यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण भागाकडे झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी कोणतीही भीती मनात बाळगू नये. लक्षणे आढळताच त्वरीत शासकीय यंत्रणा किंवा आरोग्य विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून संबंधितांवर वेळेत उपचार करणे शक्य होईल. नागरिकांनो हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळकरांना केले आहे.

कोरोनाचे संकट अभुतपूर्व आहे. याही परिस्थितीत संपूर्ण प्रशासन केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र लढत आहे. त्यामुळे स्वत:हून कोणताही निष्काळजीपणा करू नका. ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, 100 अंशापेक्षा जास्त ताप, नियमित खोकला व सर्दी यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नजीकच्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड हॉस्पीटलमध्ये तात्काळ दाखल व्हावे. तसेच याबाबत खाजगी रुग्णालयात वेळ न घालवता ग्रामस्तरावरील किंवा तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणेसोबत संपर्क करून रुग्णालयात भरती व्हावे. वरील लक्षणे असल्यास कोणत्याही नागरिकाने स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नये.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यापैकी चार रुग्ण अगदी शेवटच्या क्षणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तसेच दोन जणांना वैद्यकीय महाविद्यालयात आणत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना या रुग्णांवर उपचाराची संधीच मिळाली नाही. परिणामी या सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 195 वर गेला आहे. यापैकी तब्बल 146 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या व व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन पॉझेटिव्ह रुग्णांनासुध्दा मृत्युच्या दाढेतून काढून बरे केले आहे. त्यामुळेच येथील डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ देऊन सेवेची संधी द्या. नागरिकांनो लक्षणे आढळताच मनात कोणताही संकोच न ठेवता तात्काळ यंत्रणेला माहिती द्या. हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांच्या सपंर्कात येऊ नये. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा. एवढेच नाही तर कोरोना संकट ही एक संधी मानून नागरिकांनी यापुढे आपली जीवनशैली बदलविणे गरजेचे आहे. शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल तर आपल्या घरीच नियमित 30 मिनिटे व्यायाम, योगा करावा, असे कळकळीचे आवाहनही जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी