फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 5 सप्टेंबर, (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित केले आहे.
प्रक्षेत्र प्रशिक्षणामध्ये फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड, फळबाग व्यवस्थापन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, बहार व्यवस्थापन, फळपिकनिहाय अधिक उत्पादनाक्षम जातीची ओळख व उपलब्धता, कांदाचाळ, संरक्षित शेती, हरितगृह व्यवस्थापण, एकात्मिक किड, रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन प्राथमिक प्रक्रीया केंद्र काजू, बेदाना, सीताफळ, आवळा, डाळिंब प्रक्रिया इत्यादी शितसाखळी, रायपनिंग चेंबर शित वाहक, बाजारपेठ उपलब्धता, निर्यात, फायटोसॅनेटरी, पेस्टीसाईट, रेसिड्यु मॅनेजमेंट इत्यादीबाबत मार्गदर्शन तसेच कृषी पर्यटन या विषयांचा समावेश आहे.
प्रशिक्षणार्थींची निवड - फळबाग लागवडी, कांदा चाळ, संरक्षित शेती, प्राथमिक प्रक्रिया इत्यादीचा लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छीत असलेल्या, चालू आर्थिक वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना राज्यअंतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण करिता अर्ज करता येईल. लक्षांकाच्या मर्यादेपेक्षा अधीक अर्ज प्राप्त झाल्यास विहित पद्धतीने सोडत काढण्यात येईल.
सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच दिवसाचा राहील. यामध्ये पुणे, अहमदनगर, राहुरी येथे फलोत्पादन व कृषी क्षेत्राख्शी निगडीत कामे करणाऱ्या संशोधन संस्था, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या जातील. याकरिता प्रवास, भोजन व निवास याकरिता प्रति लाभार्थी एक हजार रुपये प्रति दिन अनुदान आहे.
शेतकऱ्याने अर्ज करतांना पुर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा प्रवर्ग, स्त्री, पुरूष मोबाईल नंबर, घटक, सातबाराची प्रत यांचा अर्जात समावेश करावा.
लाभार्थी यादीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची मान्यता मिळाल्यानंतर राज्यांतर्गत प्रक्षेत्र भेटीचे नियोजन करून वेळापत्रक निवड लाभार्थींना कळविण्यात येईल. अधीक माहितीकरिता शेतकऱ्यांनी आपले तालुका कृषी अधिकारी यांचेकडे 15 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. मागील वर्षी प्रक्षेत्र प्रशिक्षणाकरिता पाठविलेल्या लाभार्थीला पुन्हा पाठवू नये, असे उपविभागीय कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment