पॉझेटिव्ह असलेल्या 'त्या' नागरिकांचे उर्वरीत नमुने निगेटिव्ह


v तिघांनाही विलगीकरण कक्षातून मिळाली सुट्टी
v जिल्हाधिका-यांनी केले डॉक्टरांचे कौतुक
v कलम 144 चे उल्लंघन होऊ न देण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 28 : येथील स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले होते. मात्र 14 दिवसानंतर पुन्हा त्यांचे दोन नमुने प्रयोगशाळेत पाठविले असता तीनही पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आाज (दि.28) सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आता कोरोना विषाणू संसर्ग पॉझेटिव्ह असल्याची संख्या शुन्यावर आली आहे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. सुट्टी देण्यात आलेल्या तिघांनाही पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.  
दुबईवरून जिल्ह्यात आलेल्या नऊ जणांना लक्षणे असल्यामुळे 12 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह तर उर्वरीत सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे इतरांना सुट्टी देण्यात आली होती. तर पॉझेटिव्ह नमुने असलेले हे तीन जण तेव्हापासूनच विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यांच्या प्रकृतीबाबत जिल्हा प्रशासन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अतिशय दक्ष होते.  
शासनाच्या निर्देशानुसार या तिघांचे उर्वरीत दोन नमुने 14  दिवसानंतर तपासणीसाठी पुन्हा पाठविण्याच्या सुचना महाविद्यालय प्रशासनास देण्यात आल्या. त्यानुसार तिनही नागरिकांचे नमुने 26 मार्च रोजी नागपूरला पाठविण्यात आले. त्याचा रिपोर्ट 27 मार्चला प्राप्त झाला. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे उर्वरीत शेवटचे नमुने दि. 27 मार्चला पुन्हा नागपूरला पाठविले. तिनही नागरिकांचा हा शेवटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो 28 मार्च रोजी प्राप्त झाला.
14 दिवसांच्या अथक उपचारानंतर पाठविण्यात आलेले उर्वरीत दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे या तिनही नागरिकांना विलगीकरण कक्षातून शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे. मात्र त्यांना गृह विलगीकरणात पुढील 14 दिवस ठेवण्यात येणार असून आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित  तपासणी करणार आहे. शुक्रवारी रात्री एका नागरिकाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यामुळे सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात केवळ एक नागरिक आहे. तर जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 89 झाली आहे.

नागरिकांनी कलम 144 चे सक्तीने पालन करावे - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
जिल्ह्यातील तीन पॉझेटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे आता जिल्ह्यात पॉझेटिव्ह संख्या शुन्यावर आली आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय आनंददायी बातमी आहे.  यासाठी सर्व आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी प्रशंसा केली आहे. तसेच जिल्ह्यात संचारबंदी सुरू असून कलम 144 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनीसुध्दा या नियमाचे सक्तीने पालन करावे. जिल्हा प्रशासन आणखी सक्तीने या संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये. अत्यावश्यकता असेल तेव्हाच तेही  कोणत्याही एका जागेवर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. एकमेकांपासून किमान 3 मीटर अंतर राखावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.  

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी